Rahul Narwekar Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Political News : पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव असणाऱ्या नार्वेकरांच्या मतदारसंघात तीन निर्भय सभा घेणार...

Shital Waghmare

Dharashiv News : सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदे तज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या धाराशिवमधील निर्भय सभा राज्यात चांगलीच चर्चेत आली आहे. सरोदे यांनी शिवसेनेतील बंडाच्यावेळी गुवाहाटीच्या हाॅटेलात घडलेले अनेक धक्कादायक प्रसंग सांगत खळबळ उडवून दिली. आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही विधानसभा अध्यक्ष डाॅ. राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर पक्षफोडीचा आरोप केला आहे.

राहुल नार्वेकर यांना पक्ष फोडाफोडीचा दांडगा अनुभव आले, त्यांच्या मतदारसंघात आपण तीन निर्भय बनो सभा घेणार असल्याचे चौधरी यांनी जाहीर केले. काल (ता.3) रोजी झालेल्या कार्यक्रमात चौधरी यांनी नार्वेकर यांना इशारा दिला. भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार,आमदार हे राजकीय संकेत, नैतिकता काहीही बघत नाहीत. यांचा नैतिकतेशी काही एक संबंध नाही. राहुल नार्वेकरांना सगळे पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव आहे. राहुल नार्वेकरांनी जे केले त्याचे बक्षीस म्हणून त्यांना लोकसभेत अध्यक्ष करणार, असे ऐकलं आहे.

आम्ही त्यांच्या मतदारसंघात 3 `निर्भय बनो`च्या सभा घेणार आहोत, अशी घोषणाच विश्वंभर चौधरी यांनी यावेळी केली. त्यांच्या मतदारांना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) जे वागले ते सांगणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. लोकशाही व संविधान नागरिकांनी वाचवले पाहिजे. मोदी हे खोटारडी संस्कृती आणून देशाला अराजकतेकडे नेत आहेत. गुजरात मध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली असून तेथे शिक्षणाचे धींडवडे निघाले आहेत. तेथे गरीबीत वरचेवर वाढ होत आहे. भाजप लोकांना ईडीची भीती दाखवून शिक्षा मात्र अत्यल्प प्रमाणात करत आहेत, असा आरोपही चौधरी यांनी केला.

नोटाबंदी हा सुनियोजित भ्रष्टाचारच होता, अशी टीका करतानाच जाहिरात व विदेश दौऱ्यावर मोदींनी 5500 कोटी खर्च केल्याचा दावाही त्यांनी केला. तुमचा राम आणि आमचा राम यामध्ये फार मोठा फरक आहे. आमच्या देवात आणि धर्मात दलालांची गरज नाही, असा टोला लगावत महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना उत्तर प्रदेशातील बुवाला तुम्ही का बोलावता? असा सवालही विश्वंभर चौधरी यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपच्या नेत्यांना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले नसते तर कोणी शिकले नसते. मात्र सध्या महिलांसाठी सगळ्यात वाईट कालखंड असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली 7 देशांची परिषद झाली त्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात केला. मात्र, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 100 देशांची शिखर परिषद घेतली, पण त्यांनी त्याचे कधी मार्केटिंग केले नाही, असा टोला लगावतानाच उद्योजकांना या सरकारने 25 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा आरोप केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT