Sanjay Rauts Reaction After Narwekars Statement :
Sanjay Rauts Reaction After Narwekars Statement : Sarkarnama
मराठवाडा

Raut on Narwekar's Statement: सोळा आमदारांबाबत निर्णय लवकरच ; नार्वेकरांच्या विधानावर राऊत म्हणाले, '..तर कोर्टात जाणार'

सरकारनामा ब्यूरो

Chh. Sambhaji Nagar: शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं काय होणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

काल (बुधवारी) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन," असं विधान राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.

'निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार,' असं सूचक विधान नार्वेकरांनी केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नार्वेकरांची केलेल्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. राऊत आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाहेर कोणालाही जाता येणार नाही. त्याच्या मनामध्ये जर काही घटनाबाह्य असेल आणि काही घडलं तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे येणारा काळ ठरवेल,"

"विधानसभा अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे. आमचे वैयक्तीक भांडण असू शकते. कारण व्यक्ती जी आहे ती अनेक पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसली आहे. पण शेवटी ती घटनात्मक खुर्ची आहे. घटनात्मक पद आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना असलेले अधिकार यानुसार त्यांना निर्णय घ्यावे लागतील. त्याच्यामुळे मिरीट काय आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे," असे राऊतांनी स्पष्ट केलं.

"बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार," असंही नार्वेकर यांनी सूचित केलं आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं.

राजकीय दबावाने हा निर्णय

"फुटीर गटाच्या हातात शिवसेना देण्यात आली. हा केवळ खरेदी विक्रीचा निर्णय असू शकतो हे मी ऑन रेकॉर्डही सांगतो. कोर्टानेही याप्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवले आहे. निवडणूक आयोगाने राजकीय दबावाने हा निर्णय दिला. ही घटनात्मक संस्था विकली गेली आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ते वेळ काढू शकणार नाही

रिझनेबल टाईममध्येच विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले, "रिझनेबल टाईम हा 90 दिवसांचा असतो. विधानसभा अध्यक्षांना 90 दिवसात निर्णय द्यावा लागेल. ते त्यांच्या वेळेनुसार वेळ काढू शकणार नाही. 90 दिवसात निर्णय नाही दिला, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाऊ,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT