Uddhav Thackeray In Marathwada Visit Affected Farmers News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : मराठवाड्याने रझाकारांविरोधात लढा दिला, तसा आता सरकारविरोधात द्या! उद्धव ठाकरेंचे आवाहन

Uddhav Thackeray Visit In Marathwada : शेतकर्‍यांची व्यथा राज्य सरकारने ऐकून घेतली नाहीतर शेतकरी राज्य सरकारचे पीठ केल्याशिवाय राहणार नाही.

Jagdish Pansare

  1. मराठवाड्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना “रझाकारांविरोधात जसा लढा दिलात, तसा आता सरकारविरोधात लढा द्या” असे आवाहन केले.

  2. ठाकरे यांनी सध्याच्या राज्य सरकारवर तीव्र टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

  3. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे यांचे भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

Shiv sena UBT : दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे हे संवाद साधत आहेत. संपूर्ण कर्जमुक्ती आणि नुकसान भरपाई, पीकविमा मिळेपर्यंत आपण शेतकऱ्यांसोबत राहून लढा देऊ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मराठवाड्याने रझाकारांच्या विरोधात लढा दिला, तसा शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात द्यावा, असे आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला मदत देण्यासाठी नाहीत का? असा सवाल केला.

नांदडे जिल्ह्यातील पारडी, अर्धापूर गावातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेत जमिन आपत्तीत वाहून नाही गेली तर शेतकर्‍यांचे आयुष्य वाहून गेले आहे. शक्तिपीठ महामार्ग लगतच्या जमिनी मोठे व्यापारी खरेदी करत आहेत. शेतकरी रस्तावर आणि शक्तिपीठ महामार्ग त्यांच्या उरावर, अशी परिस्थिती आहे.

आम्ही शेतकऱ्यांसाठी न्याय मागतोय तर टोमणे मारतात असे म्हणतात. न्याय मागणे म्हणजे टोमणे मारणे आहे का? चंद्रपूर येथे यशोदा आबाजी राठोड या महिलेने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रात अशा अनेक आत्महत्या शेतकरी करत आहेत. त्या रोखायच्या सोडून सरकार कागदी खेळ करत आहे. राज्य सरकारने इतिहासातले सगळ्यात मोठे पॅकेज जाहीर केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात हे पॅकेज नाही तर त्याच्या नावाखाली केलेला घोटाळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन घेराव घालावा. मदत न करणाऱ्यांना माझा शेतकरी सडलेल्या तांदळाचे पोटभर जेऊ घालेल. एक-दोन रुपये पीकविमा देऊन माझ्या शेतकऱ्याची चेष्टा करणाऱ्या विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचेही मी शिवसैनिक आवाहन करतो. शेतकऱ्याने आपला आसूड आता या सरकारवर उगारला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार मुके आणि बहिरे..

नांदेड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, कळमनुरी, हिंगोलीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 90 वर्षाच्या एका शेतकऱ्याने आम्हाला शक्तीपीठ नको, असे म्हणत या महामार्गाचे काम करणारे अधिकारी हे निजामापेक्षा जास्त अत्याचार करणारे असल्याचा आरोप केला.

शेतकर्‍यांची व्यथा राज्य सरकारने ऐकून घेतली नाहीतर शेतकरी राज्य सरकारचे पीठ केल्याशिवाय राहणार नाही. 18 जुलै रोजी परदेशी समिती घोषित करून सुद्धा अद्याप पर्यन्त काहीही काम केले नाही. मराठवाड्याच्या रक्तात शौर्य आहे आणि म्हणून रझाकारांविरुद्ध लढा दिला तसा लढा या सरकारविरोधात द्यावा लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

कंत्राटदारांचा विकास करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकरी संकटात आहे, त्याच्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे. तो घालवून शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकत्र येऊया. शेतकरी हेच माझा टॉनिक आहे, शेतकर्‍यांचा पाठींबा मला पाहिजे आहे, असेही ते म्हणाले. कोरोना काळात अर्थचक्र बंद पडलेले असताना मी शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. मुख्यमंत्र्यांनाही मी आवाहन करतोय की त्यांनी पारावर येऊन शेतकर्‍यांशी पॅकेज बाबत बोलावे, खरंच त्यांना मदत मिळाली का? याची माहिती घ्यावी.

शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि 50 हजार हेक्टरी मदत याच दोन प्रमुख शिवसेनेच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी हे सरकार पाठीशी आहे. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आले. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला तर तो तुम्हाला कर्जमुक्ती मागत नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मत चोरी करून आलेल्या लोकांना घेराव घाला पण नुकसान भरपाई मागा. सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी गावाच्या पारावर आलो आहे. राज्य सरकारला वठणीवर आणण्यासाठी जात पात न बघता एकत्र आलं पाहिजे. 15 दिवसांत लिस्ट बघण्यासाठी मी पुन्हा येईल, असे सांगतानाच विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्यासंदर्भात आगामी काळात ठरवू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

FAQs

1. उद्धव ठाकरे यांनी कोणत्या ठिकाणी हे वक्तव्य केले?
→ हे वक्तव्य त्यांनी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संवाद दौऱ्यात केले.

2. ठाकरे यांनी रझाकारांचा उल्लेख का केला?
→ त्यांनी रझाकारांविरोधात मराठवाड्याने दिलेल्या लढ्याची आठवण करून देत सरकारविरोधात शेतकऱ्यांना तसाच निर्धार दाखवण्याचे आवाहन केले.

3. या वक्तव्यावर सरकारची प्रतिक्रिया काय आहे?
→ सत्ताधारी नेत्यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे.

4. ठाकरे यांच्या सभेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा होता?
→ सभेला मोठी गर्दी जमली होती आणि शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ठाकरे यांना पाठिंबा दिला.

5. या भाषणाचे राजकीय परिणाम काय असू शकतात?
→ ठाकरे यांचे वक्तव्य मराठवाड्यातील शेतकरी मतदारांवर परिणाम करू शकते आणि आगामी निवडणुकांवर त्याचा प्रभाव पडू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT