Kailas Patil Uddhav Thackeray  sarkarnama
मराठवाडा

Dharashiv News: धाराशिवकरांची 350 किलोमीटरची 'शैक्षणिक शिक्षा' थांबवा; उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आमदाराची सभागृहात मागणी

Shivsena UBT News: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा विविध कारणांनी गाजले. 'ऑपरेशन टायगर'नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Jagdish Pansare

Assembly Session 2026 : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा विविध कारणांनी गाजले. 'ऑपरेशन टायगर'नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण या विषयांवर विधानसभेचं सभागृह दणाणून सोडलं. अधिवेशनाचे सूप वाजण्यापुर्वी सभागृहाचे कामकाज पहाटेच्या साडेतीन पर्यंत सुरू होते, त्यातही त्यांचा सहभाग होता. दरम्यान, धाराशिवला स्वतंत्र विद्यापीठ द्या आणि साडेतीनशे किलोमीटरची शैक्षणिक शिक्षा थांबवा, अशी मागणी कैलास पाटील यांनी सभागृहात केली.

धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत असून ते राज्यातील सर्वाधिक सक्षम आणि सक्षमपणे काम करणाऱ्या उपकेंद्रांपैकी एक आहे. आवश्यक पायाभूत सुविधा, शैक्षणिक क्षमता आणि भौगोलिक गरज असूनही स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा अद्याप मिळालेला नाही.

परिणामी विद्यार्थी, संशोधक आणि पालकांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण, परीक्षा, प्रमाणपत्रे व अन्य प्रशासकीय कामांसाठी वारंवार छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मराठवाड्यातील शैक्षणिक समतोल साधण्यासाठी आणि धाराशिवसह परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना ही काळाची गरज असल्याचे पाटील म्हणाले. या मागणीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारच!

घड्याळात पहाटेचे तीन वाजून चाळीस मिनिटे झाले असतानाही विधीमंडळाचे कामकाज सुरू होते. शेतकऱ्यांच्या आणि सर्व सामन्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील, आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी सभागृहात आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडत राहणार. सत्ता जाहिरातींमध्ये विकासाचे दावे करत असताना, प्रत्यक्षात शेतकरी संकटात, युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आणि ग्रामीण भाग मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे.

अशा परिस्थितीत जनतेचा आवाज बनून सरकारला उत्तरदायी धरण्याचे काम ठामपणे करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने माझ्यावर ठेवलेला विश्वास हे माझे सामर्थ्य आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी माझा संघर्ष कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. वेळ पहाटेची असो किंवा मध्यरात्रीची, जनतेच्या प्रश्नांवर माझा आवाज सभागृहात कायम घुमत राहील, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT