Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दोन नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. पाणी प्रश्नावर महिनाभराचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चाच्या नियोजनावरुन खैरे-दानवे यांच्यात भडका उडाला. मला न विचारता, बोलावता अंबादास दानवे यांनी परस्पर शिवसैनिकांचा मेळावा घेतला. माझा अपमान केला, ते सातत्याने काड्या करतात, अशी तोफ खैरे यांनी माध्यमांसमोर डागली.
एवढेच नाही तर याची तक्रार थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे करण्यासाठी काल मुंबई गाठली. अपेक्षेप्रमाणे या भेटीनंतर आमच्यात काही वाद नव्हतेच, होते ते आता मिटले आहेत. पक्ष अडचणीत असताना आम्ही आता सोबत काम करणार, ते किंवा मी एकट्याने कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. दोघे मिळून कार्यक्रमाची आखणी करून त्यावर उद्धव ठाकरे यांनी मंजूरीची मोहर उठवल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू, असे खैरे यांनी मातोश्रीवरून बाहेर आल्यानंतर माध्यमांना सांगितले.
उद्धव ठाकरे यांना त्रास होऊ नये म्हणून मी चार पाऊलं मागे आलो आहे, चार पाऊल अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) मागे यावे, अशी अपेक्षा खैरे यांनी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी याबाबत त्यांना समज दिल्याचा दावाही खैरे यांनी केला. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र या वादावर चक्कार शब्दही काढला नाही. याचाच अर्थ तक्रार करण्यासाठी मातोश्रीवर गेलेल्या खैरेंचे पुढे काय होणार? हे दानवे यांना चांगलेच माहित होते. विशेष म्हणजे घडलेही तसेच.
एकूणच चंद्रकांत खैरे हे अंबादास दानवे यांच्यावर आरोप करून तोंडावर पडले, अशी काहीशी त्यांची अवस्था झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून खैरे-दानवे या दोघांनीही दावा केला होता. तेव्हाही असाच वाद माध्यमांमध्ये रंगला होता. नंतर उद्धव ठाकरे यांनी दोघांना मुंबईत बोलावून घेतले आणि दिलजमाई घडवून आणली होती. ठाकरेंनी योग्य पर्याय दिल्यानंतर अंबादास दानवे हे खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पेढा भरवून आले होते.
उद्धव ठाकरेंनी आदेश दिला, आता मी लोकसभा लढवण्यास इच्छूक होतो, तरी खैरेंचे काम करणार, असे दानवे यांनी जाहीर केले होते. पुढे खैरेंचा पराभव झाला आणि पून्हा त्यांनी अंबादास दानवे यांनी माझे काम केले नाही, ते संदीपान भुमरे यांना मॅनेज झाले, त्यांची डील झाली होती, अशा आरोपांनी राळ उडवून दिली. मात्र याची फारशी दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली नसल्याचे समजते.
चंद्रकांत खैरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते आहेत, त्यांचे आता वय झाले आहे, शिवाय सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचा सयंम सुटतो. त्यांना सांभाळून घ्या, त्यांना न दुखावता पक्ष संघटनेच्या कामात कुठेही अडथळा येणार नाही, याची काळजी घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना सांगितल्याची माहिती आहे. एकूणच काय तर उद्धव ठाकरे यांनी तावातावत मातोश्रीवर आलेल्या खैरेंना शांत करून परत पाठवले. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांना लगे रहो, असा संदेश दिला, असे दिसते. या वादात दानवे यांची सरशी झाल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.