Uddhav Thackeray News : Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray On Fadnavis : 'फडतूस', 'कलंक'नंतर ठाकरेंचा फडणवीसांवर तिसरा वार; म्हणाले,''आता त्यांना 'थापाड्या'...''

सरकारनामा ब्यूरो

Hingoli : राज्यात 'ट्रिपल' इंजिन सरकार असा टेंभा मिरवला जात आहे. पण नुसत्याच थापा मारल्या जात आहेत. 'सरकार आपल्या दारी आणि योजना मात्र कागदावरी', 'सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लय भारी ', हे सरकार नुसतं थापा मारतंय अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस - पवार सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या योजनेवर केली. या सभेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. या टीकेनंतर पुन्हा एकदा राज्यात ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना रंगण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची रविवारी हिंगोलीत सभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस - पवार सरकारवर टीकेचे आसूड ओढले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना दोन अड़ीच वर्षांचे माझं काम तुमच्यासमोर आहे.पण दुर्दैव असे की, या गद्दारांनी घात केला नसता तर आपला महाराष्ट्र मी देशातच नव्हे तर जगात अव्वल केला असता. असेही ते म्हणाले.

'' आता फडणवीसांवर बोलणंच सोडून दिलंय, कारण...''

आपले उपमुख्यमंत्री आत्ताचे. मी कोणालाही वाईट म्हणणार नाही. आता मी देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis) वर बोलणंच सोडून दिलं आहे. कारण मी काहीही बोललो तरी त्याचा बोभाटा होतो. मी अगोदर त्यांना फडतूस बोललो होतो आता पण आता बोलणार नाही. मी त्यांना कलंकही म्हटलं होतं पण आता नाही म्हणणार. आता त्यांना थापाड्या म्हणणार होतो. पण आता नाही म्हणणार. कारण मी काहीही बोललो तरी त्याचा बोभाटा होतो. अरे टरबुजाच्या झाडालाही पाणी लागते, असा खोचक टोला उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

पुढे ते म्हणाले, राज्यात दुष्काळ पडला असताना देखील उपमुख्यमंत्री फडणवीस हे जपानला गेले.तिथे जाऊन त्यांनी मानद डॉक्टरेट घेतली आणि परत आले. मला त्यांना विचारायचे आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे. आम्ही तुमचं कौतुक करतो. तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. कलंक, फडतूस बिडतूस असे काही बोलत नाही आहोत. पण तुम्ही सत्तेवर येण्याआधी आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होते. त्यावेळी जे उद्योग राज्यात आले होते, ते तुमच्या डोळ्यादेखत गुजरातला गेले. आता जपानऐवजी गुजरातला गेलेले ते उद्योग परत आणणार आहेत का ? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा असा चिमटाही ठाकरेंनी फडणवीसांना काढला.

कुरुलकरला तुम्ही फासावर लटकवणार आहेत की...?

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीतील सभेत प्रदीप कुरुलकर यांचा संदर्भ देत भाजपला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी कुरुलकर नावाचा एक शास्त्रज्ञ सापडला. ज्याने संरक्षणदलातील अनेक गुपिते पाकड्यांना सांगितले. त्याला काय करणार आहेत. त्याला तुम्ही फासावर लटकवणार आहेत का ? की त्यालाही आपला परिवारवाद म्हणून सोडून देणार आहात असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी भाजपला घेरलं.

''...आणि आम्ही निर्लज्जपणे पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळवत आहोत!''

तसेच तुम्ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी(Narendra Modi) स्टेडियमवर भारत - पाक सामना खेळवणार आहात. त्याला का हाच तुमचा हिंदुत्ववाद आहे का.. त्या सामन्याला तुम्ही कुलभुषण जाधवला बोलवणार आहात का. भारतीय जनता पक्ष काय करतोय. पाकिस्तानच्या तुरुंगात कुलभुषण जाधव सडतो आहे. जो देशासाठी काम करत असताना पकडला गेला होता. पण त्याच्या सुटकेसाठी काय केले जात आहे. एक सुषमा स्वराज होत्या. त्या असेपर्यंत आशा होती. कुलभुषण भारतात परत येईल. पण आता कुलभुषणचं नावही ऐकू येत नाही. तो तिकडे तुरुंगात जिवंत आहेत की मेलाय हेही माहिती नाही. आणि आम्ही निर्लज्जपणे पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळवत आहोत अशी घणाघाती टीकाही उध्दव ठाकरेंनी भाजपवर केली.

डबल इंजिन सरकारला आता अजितदादांचा तिसरा डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत. काय हो तुमच्या पक्षात काय कर्तृत्व नाही का?. चांगले नेते तयार करण्याचे कर्तृत्व नाही. नेते बाहरेचे लागतात. वडील माझे लागतात. पक्ष फोडला; पण वडील माझे वापरायचे. दिल्लीतील तुमच्या वडिलांमध्ये मते मागायची हिंमत राहिलेली नाही का?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपला केला.

'' गुजरात जवळ आहे जपानपेक्षा...''

पुढे ते म्हणाले, राज्यात दुष्काळ पडला असताना देखील उपमुख्यमंत्री फडणवीस हे जपानला गेले.तिथे जाऊन त्यांनी मानद डॉक्टरेट घेतली आणि परत आले. मला त्यांना विचारायचे आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे. आम्ही तुमचं कौतुक करतो. तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. कलंक, फडतूस बिडतूस असे काही बोलत नाही आहोत. पण तुम्ही सत्तेवर येण्याआधी आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होते. जे उद्योग राज्यात आले होते. ते तुमच्या डोळ्यादेखत गुजरातला गेले. जपानऐवजी गुजरातला गेलेल ते उद्योग परत आणणार आहेत का ? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा असा चिमटाही ठाकरेंनी फडणवीसांना काढला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT