Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जाला सरकारी वकील उज्जवल निकम यांनी आज कडाडून विरोध केला. एवढेच नाही तर या खून प्रकरणातील इतर आरोपींना कुठल्याही प्रकारची सवलत देऊ नये, तसेच त्यांचे दोषमुक्तीचे अर्ज फेटाळण्यात यावे, अशी मागणी निकम यांनी केली. यावर पावणे दोन तास वाल्मिक कराड याच्या वकीलांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून पुढील सुनावणी 30 आॅगस्ट रोजी होणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि नंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आठ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. बीडच्या (Beed News) विशेष न्यायालयात या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. यापुर्वीच न्यायालयाने वाल्मिक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्याने वकीलांमार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय विष्णू चाटेसह इतर आरोपींनी आपल्याला दोषमुक्ती मिळाली यासाठी अर्ज केले आहेत.
आज झालेल्या सुनावणीत अॅड. उज्जवल निकम यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. तसेच इतर आरोपींनी केलेले दोषमुक्तीचे अर्ज फेटाळून त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत दिली जाऊ, नये अशी मागणी करत जोरदार युक्तीवाद केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तीन तास सुनावणी पार पडली. हा खटला गंभीर असून आरोपींना कुठलीही सवलत मिळू नये, असा पवित्रा निकम यांनी घेतला.
आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. वाल्मिक कराडला जामीन मिळतो का? इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय काय निकाल देते, याची उत्सूकता संपूर्ण जिल्ह्याला होती. परंतु न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आता पुढील सुनावणी 30 रोजी होणार आहे. सुनावणी दरम्यान, उज्जवल निकम यांनी वाल्मिक कराड यांच्या वकीलांचे सगळे मुद्दे खोडून काढले.
अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती, आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोप निकम यांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड्स) सादर करून फेटाळला. सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध करताना खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड होता आणि त्यानेच कराडला मदत केल्याचे निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, आरोपीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी चाटेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दरम्यान, 22 जुलै रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर कराडच्या वकिलाने म्हणणे मांडले होते. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करून कराडच्या दोष मुक्ती अर्जाला कडाडून विरोध केला होता. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.