Vel Amavasya puja
Vel Amavasya puja sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : निवडणुकीची तयारी तरीही नेतेमंडळी शेतात ! कारणच तसं...

अविनाश काळे

Umarga : धाराशिव, लातूर जिल्ह्यासह सीमावर्ती कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांच्या गावात वेळ अमावस्यांची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. निसर्गाचा दगाफटका कितीही बसो, मात्र काळ्याआईचे मनोभावे पूजन करत शेतकऱ्यांनी शेतातील उत्पन्नात समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करून गुरुवारी (ता. 11) वेळा अमावस्या (येळवस) उत्साहात साजरी केली. दरम्यान, राजकीय मंडळींचे नेहमी बिझी शेड्युल असते. त्यात संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षात हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी उमरगा तालुक्यातील दिग्गज नेते इच्छुक आहेत. निवडणुकीच्या चर्चेचे गुऱ्हाळ तर नेहमीच असते, मात्र वेळात वेळ काढून राजकीय नेतेमंडळींनी शेतात वेळ घालवला.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाभळगावातील शेतात दरवर्षी वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी आवर्जून येत असत. त्यांच्या निधनानंतर ती जबाबदारी आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख पार पाडत आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, धाराशिव - कळंबचे आमदार कैलास पाटील, भूम - परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांचे शेतीकडे विशेष लक्ष असते.

उमरग्यातील राजकीय नेतेमंडळींनी गुरुवारी वेळ अमावस्येनिमित्त शेतात वेळ घालवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी बलसूर येथील शेतात पाच पांडव, लक्ष्मीचे पूजन करून दर्शन घेतले. प्रा. बिराजदार धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील लोकांशी संपर्क करताहेत. भेटीगाठी घेताहेत. उमरग्यात येणाऱ्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी ते संवाद साधताहेत. वेळ अमावस्येच्यानिमित्ताने ते शेतात होते. शेततात असतानाही अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत होते. कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, किरण गायकवाड यांनी आष्टा (जहागीर) येथील शेतात वेळ अमावस्या साजरी केली. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांनी मुरुम येथील शेतात वेळ अमावस्येनिमित्त उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी मुळजच्या शेतात वेळ अमावस्या साजरी केली, तर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्रिकोळी शिवारातील शेतात सहकुटुंब उपस्थित राहून वनभोजनाचा आनंद घेतला.

असे असतात खाद्यपदार्थ ...

वेळ अमावस्येनिमित्त विविध गावरान खाद्यपदार्थ तयार केले जातात. बाजरीपासून बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी, तसेच विविध पालेभाज्यांपासून बनविलेली भाजी (भज्जी), वांग्याचं कांद्याचं भरित, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आणि चवदार अंबिल घोट.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT