Vijay Wadettiwar Sarkarnama
मराठवाडा

Vijay Wadettiwar : लाडक्या बहिणीवरून रवी राणांचे वादग्रस्त विधान सरकारच्या मनातील; विजय वडेट्टीवार बरसले..

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना लागू केली आहे. हीच योजना घेऊन सध्या भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपला प्रचार करत आहेत. मात्र महायुतीतील आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत महायुतीला मतदान केले नाहीतर दिलेली रक्कम काढून घेतली जाईल, असे वादग्रस्त विधान केले आहे.

यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणांच्या वक्तव्यावर सरकारला अक्षरशः धारेवर धरले.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. ही योजना विधानसभेत तारणहार ठरण्याची आशा सरकारला आहे. त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.

सत्ता आली तर त्यात वाढ करून 3 हजार करणार असल्याचेही रवी राणा म्हणाले. मात्र ही योजना कायम करण्यासाठी विधानसभेत आम्हाला मतदान करा, असे आवाहन राणांनी केले. निवडणुकीत मतरूपी आशीर्वाद दिला नाही, तर तुम्हाला दिलेले 1500 रुपये एक भाऊ म्हणून माघारी घेईन, असे विधान आमदार रवी राणांनी Ravi Rana केले आहे.

राणा यांनी सरकारच्या मनातील वक्तव्य केल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मते मिळविण्यासाठी बहिणींना फसवणारी ही योजना आणली आहे. असे असतानाही आमदार रवी राणा बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातले बोलले आहेत.

आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे काय? राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा आहे. त्यामुळे सरकारने बहिणींची माफी मागावी, असा आग्रह विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी धरला.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेत आहेत. यांना दोन वर्षांपूर्वी बहीण आठवली नाही. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, त्याबद्दल सरकार बोलत नाही. आता मतासाठी फसव्या योजना आणल्या जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

राज्य चोरांचे झाले आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. कमिशनखोरी ४० टक्क्यांवर गेलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये टक्केवारीवरून शीत युद्ध सुरू आहे. बेरोजगारी वाढली आहे. उद्योग गुजरातला गेले आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.

शेतकऱ्यांना 15 हजार कोटी रूपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र 4600 कोटी रूपये दिले. एक नंबरचे राज्य अकराव्या क्रमांकावर नेऊन ठेवले. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेले, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारची खरडपट्टीही काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT