Dilip Deshmukh and MLA Abhumanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

Latur: दिवंगत विलासराव देशमुखांच्या भावाचे अन् भाजप आमदाराचे 'सूर' जुळले : मराठवाड्यातील 'साखरे'च्या राजकारणात नवा ट्विस्ट

Diliprao Deshmukh, Abhimanyu Pawar, Latur Politics: लातूरमध्ये काँग्रेसचे दिलीपराव देशमुख आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार एकाच व्यासपीठावर आले. सहकार, शेतकरी विकास आणि सकारात्मक राजकारणाचा संदेश देत बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली.

Jagdish Pansare

Latur Politics: लातूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेले काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे बंधू दिलीप देशमुख आणि औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचे सूर जुळल्याचे चित्र आज पहायला मिळाले. वैचारिक मतभेद आणि वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी हे दोन नेते एकाच व्यासपीठावर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु शेतकरी आणि सहकार क्षेत्रांत 'सहकार्य' करण्याचे धोरण या दोन्ही नेत्यांनी स्वीकारल्याचे दिसून आले.

बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या भूमि पूजन व रोलर पूजन सोहळा नुकताच झाला. यानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. सहकाराबाबत 'सहकार्य' पूर्ण राजकारणाचे अनोखे दर्शन या निमित्ताने जिल्ह्यात पहायला मिळाले.

दिलीपराव देशमुख यांनी आपल्या भाषणात लातूर जिल्ह्यातील राजकारणाची जुनी परंपरा अधोरेखित करत, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वैचारिक मतभेद होते, मात्र विकासाच्या प्रश्नावर सहकार्याचे राजकारण होत होते, असे सांगत जिल्ह्यात पुन्हा सहमतीचे राजकारण उभे राहण्याची गरज व्यक्त केली. विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे त्यांनी केलेले आवाहन हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्‍या महत्त्वाचे मानले जात आहे.

देशमुख यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणावरही अप्रत्यक्ष भाष्य करत, सहकारी संस्थांमध्ये सत्ता संघर्षापेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट केले. शेतकर्‍यांना वेळेवर ऊस बिल, योग्य एफआरपी आणि इथेनॉल धोरणात सुधारणा करण्याची गरज त्यांनी सांगीतली. केंद्र सरकारने ऊसावर आधारित इथेनॉलचे दर वाढविल्यास सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या धोरणांचे समर्थन करत, एनसीडीसीमार्फत मारुती महाराज कारखान्यास ११० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर झाल्यामुळे डिस्टिलरी प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगीतले. इथेनॉल उत्पादनामुळे साखर उद्योगाला नवे आर्थिक बळ मिळत असून सहकार क्षेत्र अधिक सक्षम होत असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, आमदार पवार यांनीही जिल्ह्यात विकासाभिमुख आणि सकारात्मक राजकारणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

भाजप आणि काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी एकाच कार्यक्रमातून विकासासाठी सहकार्याचा संदेश दिल्याने हा केवळ कारखान्याचा कार्यक्रम न राहता जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समि‍करणांचे संकेत मानले जात आहे. विशेषतः सहकार क्षेत्रातील निवडणुका आणि साखर राजकारणाच्या संदर्भात या व्यासपीठावरून व्यक्त झालेले विचार भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकतात.

बिनविरोध निवडणुकीचा संदर्भ

मारुती महाराज कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा उल्लेख करत दिलीपराव देशमुख यांनी त्याला 'जिल्ह्यातील सकारात्मक राजकारणाचे उदाहरण' म्हटले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे डिस्टिलरी प्रकल्पाला निधी उपलब्ध झाल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचेही त्यांनी जाहीर कौतुक केले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून भाजप आमदाराचे झालेले हे कौतुकही राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT