Parbhani-Hingoli News : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना महायुतीतून विरोध होऊ लागल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेतून विरोध झाला आणि जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली तर तिकडूनही उमेदवारी मिळवण्याचा विप्लव बाजोरिया करत असल्याची माहिती आहे. बाजोरिया यांच्या या दोन्ही डगरीवर हात ठेवण्याच्या खेळीने महायुतीत खळबळ उडाली आहे.
परभणी-हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांचे सुपूत्र अभिमन्यू यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. तत्पुर्वीच विप्लव बाजोरिया यांना तयारीला लागा, असा निरोप देण्यात आला होता. परंतु सहा वर्ष बाजोरिया मतदारसंघात फिरकले नाहीत, असा सूर महायुतीतील स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींनी काढला आणि त्यांच्या नावाला विरोध सुरू केला. त्यानंतर गोपीकिशन बाजोरिया यांनी विप्लव यांचा बचाव करताना सहा वर्षात दोन्ही जिल्ह्यात 130 कोटींची कामे केल्याचा दावा केला होता.
आमचे मतदार हे नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्याशी आम्ही कायम संपर्कात असतो, असे सांगत गोपीकिशन बाजोरिया यांनी विरोधकांवर पलटवार केला होता. पक्षांतर्ग विरोध लक्षात घेता बाजोरिया पिता-पुत्रांनी आपला बी प्लानही तयार केल्याची चर्चा आहे. महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपले संख्याबळ कसे अधिक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत जागेवार आपलाच दावा असल्याचे सांगीतले आहे.
भाजपाने आपल्यासह यशवंत सेना, जनसुराज्य पक्ष आपल्या सोबत असून राष्ट्रवादीपेक्षा आपले संख्याबळ अधिक असल्याचे दाखवून देत भाजपाला जागा सोडवून घेण्याची मागणी श्रेष्ठीकडे केली आहे. या पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे यांनी त स्वतःच्या नावासह जिंतुर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व माजी आमदार गजानन घुगे यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये देखील अनेक दावेदार आहेत. त्यामध्ये माजी आमदार विजय भांबळे, मनपाचे नगरसेवक विजय जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख, मानवतचे माजी नगराध्यक्ष अंकुश लाड, हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तिकीटाची मागणी केली आहे. वास्तविक पाहता संख्याबळाच्या बाबतीत राष्ट्रवादी सर्वात आघाडीवर आहे. शिवसेनेकडूनही अनेक दावेदार आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईदखान, हिंगोलीचे राम कदम हे प्रमुख दावेदार आहेत.
राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांच्यासह इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहेत. परंतु पक्षाचे प्रमुख दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्याची राष्ट्रवादी निराधार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पक्षाची बार्गेनिंग पावर कमी पडत असल्याचे चित्र आहे.
तर भाजपाला ही जागा सुटण्याची शक्यता धुसर आहे. कारण राज्य पातळीवर 17 पैकी 11 जागा भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. चार जागा शिवसेनेला तर दोन जागा राष्ट्रवादीला. शिवसेनेच्या चार पैकी एक जागा परभणी-हिंगोलीची असल्याची चर्चा आहे.
बाजोरियांचे काय होणार?
माजी आमदार विप्लब बाजोरिया हे शिवसेनेमध्ये प्रबळ उमेदवार आहेत. तर त्यांनी राष्ट्रवादीकडून लढावे असे राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांची इच्छा आहे. परंतु त्यांना समाज माध्यमावर मात्र मोठा विरोध होतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीला किंवा शिवसेना ज्या कुणाला जागा सुटेल त्यांचे उमेदवार बायोरिया असतील असे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.