Ambadas Danve -Imtiaz Zalil Sarkarnama
मराठवाडा

Vishalgarh Encroachment Case : इम्तियाज जलील तेव्हा तुमचा कंठ का फुटला नाही? अंबादास दानवे यांनी सुनावले...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar, 16 July : कोणत्याही हिंसेचे समर्थन करता येणार नाही इम्तियाज जलील. अतिक्रमण हे अतिक्रमण असते! विशाळगड हे नरवीरांच्या शौर्याचे प्रतीक आहे, कोंबड्या कापून खायची ती राजधानी नाही. विशाळगडावर ज्यांचे अतिक्रमण आहे, मग ते कोणीही असोत, त्यांनी ते स्वतः काढून घेणेच शहाणपणाचे ठरणार आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एमआयएम’चे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना सुनावले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर इम्तियाज यांनी थेट संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला होता. संभाजीराजे तुम्ही खरंच शाहू घराण्याचे वंशज आहात का? असा सवाल करत आंदोलकांचे नेतृत्व केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटवर इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सर्वधर्म समभावाची शाल आपण लोकसभा निवडणुकीत घालून फिरलात, आता लोकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही करा. मात्र, जेव्हा देवगिरी किल्ल्यातील भारत माता मंदिरासह अन्य मंदिरात पूजा करणाऱ्या परिवारांना ‘सरकारी फतवा’ काढून मज्जाव करण्यात आला, शेकडो वर्षांची परंपरेला खंडित करण्याचा डाव झाला, तेव्हा तुमचा कंठ का नाही फुटला? असा टोला दानवे यांनी इम्तियाज जलील यांना लगावला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून गाजतो आहे. दोन दिवसांपूर्वी काही शिवप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी विशाळगडावर आंदोलन केले. यावेळी दगडफेक करून तेथील वाहने फोडण्यात आली, तसेच काही मुस्लिम कुटुंबांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

पोलिसांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत आंदोलक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली. यावरून राजकारण सुरू असतानाच काल इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त करत विशाळगडावरील कारवाईचा निषेध केला होता.

संभाजीराजे छत्रपती यांनी हल्लेखोरांचे नेतृत्व केल्याने त्यांच्याबद्दलचा आदर संपला. ते खरंच शाहू घराण्याचे वंशज आहेत का? असा सवाल उपस्थित करत लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करायला लावणाऱ्या मौलांनावरही टीका केली होती. विशाळगडावरील घटनेवर व्यक्त होणाऱ्या इम्तियाज जलील यांना अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत अतिक्रमण हटवण्याचे आवाहन करण्याचा सल्लाही दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT