Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad News : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचे खापर कराडांनी महाविकास आघाडीवर फोडले..

Jagdish Pansare

Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीप्रश्न पुन्हा पेटला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराला आज नियमित पाणी न मिळण्यास भाजप आणि एमआयएम हेच जबादार असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी केला होता. (BJP Political News) यावर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी पलटवार केला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना रखडण्याला महाविकास आघाडी सरकार जबादार होते, असा आरोप कराड यांनी पत्रकार परिषदेत केला.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने (Marathwada) शहराच्या पाणीपुरवठा योजनेची निविदा दीड वर्षे उशिराने अंतिम केली. त्यामुळेच आज नागरिकांचे हाल सुरू आहेत, असा दावाही कराड यांनी केला. समांतर पाणी पुरवठा योजना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यामुळे बंद पडली. जानेवारी २०२४ मध्ये शहरातील बहुतांश भागाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन कराडांनी दिले.

शहरासाठी २७४० कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. या योजनेचा आढावा डॉ. कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने योजनेची निविदा प्रक्रिया केली नाही, त्यामुळे दीड वर्षे उशिराने शहराला पाणी मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच योजनेचा खर्चही वाढला असून समांतर पाणीपुरवठा योजना खैरे यांच्यामुळेच बंद पडली, याचा पुनरुच्चारही कराड यांनी केला. नव्या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. उद्भव विहिरीसाठी जायकवाडी धरणात २० मीटरपर्यंत खोदकाम केले जात आहे. हे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर आवश्‍यक काँक्रेटीकरणाचे काम झाल्यानंतर मार्च २०२४ पासून पंपहाउसचे काम सुरू होणार आहे.

त्यासोबतच जुन्या ७०० मिलिमीटर योजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू असून, ही योजना जानेवारी २०२४ मध्ये कार्यान्वित होईल. जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला उशीर लागणार असला तरी सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्रात ४० टक्के अधिकचे पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था होईल. त्यामुळे ९० एमएलडी पाणी अधिक येऊ शकते. जानेवारीपासून शहराच्या बहुतांश भागात तीन दिवसांआड पाणी दिले जाईल, असे आश्वासनही कराड यांनी दिले.

तसेच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विविध बॅंकेमार्फत राज्यात ८५४ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज वाटप पथविक्रेत्यांसह गरजूंना करण्यात आले असून, देशात कर्ज वाटपात मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्‍ट्र पाचव्या क्रमांकावर असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. महापालिका, नगरपालिकांकडे पीएम स्वनिधीसाठी नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांना विविध आठ योजनांचा लाभ मिळतो. त्यात रेशन कार्ड, २० रुपयांत विमा सुरक्षा, आयुष्यमान भारत कार्ड, जननी सुरक्षा योजना, मातृत्व योजनेसह इतर योजनांचा यात समावेश आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT