Beed, 25 June : विलास घुले या उमद्या तरूणाचा नाहक बळी गेला. आरोपी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. घुले कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा इशारा भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी दिला.
केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले या हाॅटेल चालक तरुणाचा एका टोळक्याने चाकूने हल्ला करून खून केला. भांडण सोडवायला गेलेल्या विलासवर त्याला जीवे मारण्याच्या हेतूनेच हल्ला करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील गावकरी हाॅटेलमध्ये 20 जून रोजी आठ-नऊ जणांच्या टोळक्यामध्ये वाद झाला होता. हे भांडण सोडवण्यासाठी म्हणून विलास घुले हा तरुण मध्ये पडला. त्या वेळी या टोळक्याने त्याच्यावर चाकूहल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता, की त्यात विलास घुले या तरुणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. आरोपींच्या अटकेसाठी तसेच या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तीन दिवस केज तालुक्यात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
पोलीसांनी घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ यांचे नाव पुरवणी जबाबात नोंदवले आहे. दरम्यान, आज प्रीतम मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबियांची भेट घेत या संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असा दिलासा दिला. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊन एसआयटी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून कुटुंबाला न्याय मिळेल, ही आमची भावना आहे.
पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी आज मी आले आहे. आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये असे कधीही झाले नाही की कुठे दुर्दैवी घटना घडली आणि पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मुंडे कुटुंब पुढे आले नाही. माझ्या संवेदना व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे, असे प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगीतले.
घुले कुटुंब अतिशय दुःखामध्ये आहे, त्यांना न्याय मिळेल ही आमची सरकारकडून अपेक्षा आहे. परंतु हा न्याय मिळत असताना जर कुठल्या पद्धतीचं काही कमी जास्त होतं असेल तर तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी मागे पुढे पाहणार नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा, ज्या लोकांचा या प्रकरणाशी संबंध, सहभाग स्पष्ट होईल या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबाची आहे. त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. कारण त्यांचा घरातला इतकं गोड लेकरू त्यांनी गमावलेलं आहे. त्यामुळे मला वाटत या कुटुंबाच्या मनाला शांती मिळेल, त्यांना वाटेल की आमच्या माणसाचा न्याय झाला, यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील, हे आमचे पण कर्तव्य आहे.
या प्रकरणात पोलीसांकडून सहकार्य मिळाले नाही, ते मिळाले असते तर 48 तास मृतदेह ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली नसती, अशी नाराजीही प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली. आज आपला माणूस गेला तर निदान त्याच्यावर सर्व संस्कार तरी व्यवस्थित पार पडावे ही कोणत्याही कुटुंबाचे भावना असते, पण ही भावना असताना सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून मृतदेह तसाच ठेवावा लागला. या कुटुंबाला न्याय आणि विलास घुलेच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.