Sanjay Shirsat | Atul Save Sarkarnama
मराठवाडा

Shirsat V/S Save On Water issue : संभाजीनगरकरांच्या पाणी प्रश्नावर मंत्री शिरसाट-सावे यांचे स्वतंत्र दावे!

Residents of Sambhajinagar question when they will get water, as Shirsat and Save make independent claims about the issue. : 2016 मध्ये तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. अतुल सावे यांनी या योजनेसाठी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना पाण्यासाठी मात्र तरसावे लागते. आठ-दहा दिवसात एकदा पाणी मिळत असल्याने महापालिकेत आतापर्यंत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप आणि विरोधी पक्षांनाही लोक आता जाब विचारू लागले आहेत. पंचवीस तीस वर्षात नागरिकांना नियमित पाणी न देऊ शकणारे सत्ताधारी मंत्री आता स्वतंत्र दावे करत पाणी देणार असल्याचे सांगत आहेत.

राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे (Atul Save) आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सूर सध्या चांगलेच जुळले आहेत. नुकताच या दोघांचा मंत्री झाल्याबद्दल नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी संजय शिरसाट यांनी आमच्या दोघात कोणी तिसरा नको, म्हणून प्रसंगी पालकमंत्री पद एक्सचेंज करण्याची देखील आपली तयारी असल्याचे म्हटले होते. मात्र शहरासाठी मंजूर झालेल्या आणि अंतिम टप्यात काम असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना पाणी कधी मिळणार? यावरून दोघांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले.

एकाच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंत्री अतुल सावे यांनी शहराला येत्या जून महिन्यात पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितले. मात्र त्यांचा हा मुद्दा खोडून काढत पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शहराला एप्रिल महिन्यातच पाणी दिले जाईल, असा दावा केला. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी जे बोलतो ते खरं करून दाखवतो. त्यामुळे शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा एप्रिलपासूनच केला जाईल, असे शिरसाट यांनी 'डंके की चोट पे'सांगितले. आता कोणाचा दावा खरा ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2016 मध्ये तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. तेव्हा राज्यमंत्री असलेल्या अतुल सावे यांनी या योजनेसाठी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु नऊ वर्ष उलटून गेली तरी ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. एक हजार कोटींनी योजनेची किमंत वाढली असली तरी संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे शहरवासियांवर पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.

योजना मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये मधल्या काळात राजकीय कलगितुरा रंगला होता. महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र त्यानंतर युती सरकारच्या अडीच वर्षात या योजनेला म्हणावा तसा वेग मिळाला नव्हता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहरातील नेते मंडळी, मंत्री यांचे लक्ष पाणी प्रश्नाकडे गेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना येत्या ती महिन्यात पूर्ण करा, असे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिल्या आहेत. या संदर्भानेच मंत्री अतुल सावे हे जूनमध्ये शहराला पाणी मिळेल असे सांगत आहेत. मात्र पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपण संबंधित अधिकाऱ्यांना एप्रिलमध्येच शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, असे सांगून त्यानूसार पाणी दिले जाईल, असा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT