Marathwada Political News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षापुर्वी शिवसेनेत फूट पडली. चाळीस आमदार, मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत गेले. दरम्यानच्या काळात शिंदेंच्या बंडात सहभागी न होता शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या खासदार, आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. पण या प्रलोभनाला बळी न पडता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे कायम राहिले.
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimabalkar),परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर व मराठवाड्यातील इतर काही आमदारांचा यात समावेश होता. लोकसभा निवडणुकीत ओमराजे, संजय जाधव यांना निष्ठेचे फळ म्हणून त्या त्या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी दिली. मतदारांनीही या दोघांसह हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून देत लोकसभेत पाठवले. परभणीचे जाधव सलग तिसऱ्यांदा, ओमराजे दुसऱ्यांदा तर आष्टीकर यांची पहिल्यादाच लोकसभेत एन्ट्री झाली.
सध्या मराठवाड्यातील उद्धवसेनेच्या या निष्ठावंत 'टायगर'यांची राज्यभरात चर्चा आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून राबवण्यात येत असलेल्या 'मिशन टायगर'मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) पक्षाच्या या तीन खासदारांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मराठवाडा, महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. परिणामी 'अब की बार तीन सौ पार'ला आपटी बसली आणि केंद्रातील मोदी सरकारला नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या सत्ता स्थापनेसाठी घ्याव्या लागल्या.
बहुमताच्या जोरावर सत्ता राबवण्याची गेल्या दहा वर्षात सवय झालेल्या भाजपाला या कुबड्या सहन होईना. मग महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा कुमकूवत करण्यासाठी महायुतीकडून मिशन हाती घेण्यात आले आहे. मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांना शिंदे गटात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याला दुजोरा दिला. असेच मिशन राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राबवले जाणार असल्याची चर्चा आहे.
मिशन टायगरमधील हवा काढण्यासाठी दिल्लीत ससंदेतील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 पैकी 8 खासदारांनी एकजुटीची वज्रमूठ दाखवली होती. त्यावरही शिंदे गटाने ही वज्रमूठ किती दिवस कायम राहते हे लवकरच दिसेल, असे सांगत मिशन टायगर यशस्वी होणारच, असा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, परभणी या चार मतदारसंघात उमेदवार दिले होते.
पैकी संभाजीनगर वगळता तीनही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यामुळे मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही भक्कमपणे उभा आहे. आता या तिघांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मिशन टायगर राबवत आहेत. एकजुटीची वज्रमूठ दाखवत उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांना 'करारा जवाब' दिला आहे. त्यात मराठवाड्यातील ओमराजे, जाधव आणि आष्टीकर या तीन वाघांनी महायुतीच्या 'टायगर'ला असा काही पंजा मारला आहे, की त्याचे ओरखडे स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.