Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : महायुतीने तुमचं काम केलं नाही का ? दानवे चांगलेच वैतागले; म्हणाले...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Politics : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभेच्या जालना मतदारसंघात दारुण पराभव झाला. सलग पाच टर्म निवडून आलेल्या मतदारसंघात मतदारांनी यावेळी मात्र दानवेंना चकवा दिला. मतदानानंतर समोर आलेल्या आकडेवारीत रावसाहेब दानवे यांना विधानसभेच्या सहा पैकी एकाही मतदारसंघात मताधिक्य नाही. अगदी पैठण, सिल्लोड या महायुतीच्या दोन मंत्र्यांच्या अन् स्वतःच्या मुलाच्या भोकरदन-जाफ्राबादमध्येही दानवे पिछाडीवर आहेत.

अशावेळी सहाजिकच महायुतीने मित्र धर्म पाळला नाही का? असा प्रश्न दानवे Raosaheb Danve यांना विचारण्यात येत आहे. महाराष्ट्रात, मराठवाड्यात त्यांनी याचे उत्तर दिले, पण दिल्लीतही त्यांना याच प्रश्नाने भंडावून सोडले. तेव्हा दानवे यांनी दिल्लीतही माझा पराभव कोणामुळे नाही, तर जनतेने केला असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत.

कोणी मदत केली, कोणी पक्षात राहून विरोधात काम केले, महायुतीच्या नेत्यांनी काय भूमिका निभावली या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत खबर दानवेंनी गोळा केली आहे. पण या सगळ्याचे उट्टे काढण्याची ही योग्य वेळ नाही हे चाणाक्ष्य दानवे चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी रावसाहेब दानवे यांना मित्र पक्षाच्या नेत्यांबद्दल प्रश्न विचारले, तरी ते यावर सध्या काहीच बोलायला तयार नाहीत.

देशातील एनडीए सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याला रावसाहेब दानवे आवर्जून उपस्थितीत होते. आपल्या मंत्रालयाचा पदभार सोडताना सोमवारी त्यांनी पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या पराभवाची कारणे, मित्रपक्षांनी दगा दिला का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.

यावर माझा पराभव जनतेने केला, माझ्या विरोधात कोणीही काम केले नाही. विजयाचे श्रेय घ्यायला सगळे समोर येत असतात, पण पराजयाला कोणाला जबाबदार धरता येणार नाही. माझ्या पराभवाचे श्रेय कोणी घेत असेल, किंवा आम्ही दानवेंना पाडले असे म्हणत असेल तर तो त्यांचा मुर्खपणा आहे. एखाद्या नेत्याने, व्यक्तीने काम केले नसले तर त्यासाठी सगळ्या महायुतीला दोषी धरता येणार नाही, असेही दानवे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल देत या विषयावर ठोस निर्णय झाल्यानंतर बोलता येईल, असे सांगत बोलणे टाळले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT