Shivsena UBT : अंबादास दानवे भाजपच्या मुशीत तयार झालेले आहेत, म्हणून त्यांच्यात चिकाटी, संघटन कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खुणावले. तर विधान परिषदेच्या कठीण निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टाळी दिली. महायुतीतील या दोन पक्षांमध्ये त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना आता आपल्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, पण तुम्ही निष्ठा दाखवत आपली उंची आणखी वाढवा, असे आवाहन करतानाच कुठेही जाऊ नका, इथेच थांबा, अशी साद घातली आहे.
गेली अडीच-तीन वर्ष अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता म्हणून आपली कारकीर्द गाजवली. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे दानवे यांना अधिक महत्व प्राप्त झाले होते. नागपूर आणि मुंबईतील गेल्या दोन्ही अधिवेशनात सभागृहात आणि विधानभवन परिसरात अंबादास दानवे यांचाच आवाज सरकारच्या विरोधात घुमत होता. माध्यमांच्या केंद्रस्थानीही कायम दानवेच राहिले. शिवसेनेत पडलेली फूट ही खऱ्या अर्थाने कोणाच्या पथ्यावर पडली असेल तर ती अंबादास दानवे यांच्या. विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सुरवातीची काही वर्ष बॅक बेंचरच्या भूमिकेत ते वावरले.
महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अंबादास दानवे यांना त्यांच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळाली. अंबादास दानवे यांचे संघटन कौशल्य, आंदोलनातील अभिनव संकल्पना, परफेक्ट नियोजन याची भुरळ उद्धव ठाकरे यांना आधीच पडली होती. याचेच फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा आणि त्याची जबाबदारी तेव्हा राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्यावर सोपवण्यात आली होती. पक्षप्रमुखांचा आदेश या दोन्ही नेत्यांनी शिरसावंद्य म्हणत अंबादास दानवे यांच्यासाठी हात मोकळा सोडला आणि अगदी एमआयएमचीही मदत घेत त्यांना निवडून आणले होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घाट घालून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले गेले. अडीच वर्ष केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. पण नंतर मात्र शिवसेनेला खिंडार पाडत अख्खा पक्षच फोडला. चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा अंबादास दानवे यांनाही गळ टाकण्यात आला होता, अशी चर्चा त्यावेळी झाली. पण विधान परिषदेचा उर्वरित कालावधी आणि पक्ष फुटल्यानंतर आपल्याला मोठी संधी मिळू शकते हे अंबादास दानवे यांनी हेरले आणि ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच राहिले. पुढे त्यांना याचा कसा फायदा झाला हे सर्वश्रुत आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद ही अंबादास दानवे यांची मोठी उपलब्धी होती. जिल्हा पातळीवर काम करणारा एक सामान्य नेता, आमदार थेट राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या पंगतीत जाऊन बसला. पक्षप्रमुखांसह सत्ताधारी नेते, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रांगेत बसण्याचा मान दानवे यांना मिळाला. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाच्या जबाबदारीचे भान ठेवत अंबादास दानवे यांनी स्वतःमध्ये कमालीचा बदल करून घेतला. अभ्यासपूर्ण भाषणे, आक्रमक मांडणी, सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याचे कसब आत्मसाद करत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली.
जिल्ह्यातील नेता मराठवाडा, राज्याचा झाला..
अंबादास दानवे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात भाजपामधून केली. पंधरा वर्ष त्या पक्षात तयार झाल्यानंतर पक्षातंर्गत वादातून त्यांना बाहेर पडावे लागले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा स्वीकार करत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, जिल्हाप्रमुख, आमदार आणि त्यानंतर थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदापर्यंत दानवे यांनी मजल मारली. अर्थात यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. यातून जिल्ह्यातील इतर नेत्यांसाठी त्यांनी मोठी स्पर्धाही निर्माण केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची संधी दानवे यांना अधिक मिळाली. उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्यातील गुण हेरले आणि त्यांना योग्यवेळी संधी देत पक्षही बळकट केला. जिल्ह्यात खैरे विरुद्ध दानवे या वादात ठाकरेंनी कायम आपले वजन दानवेंच्याच पारड्यात टाकले. पक्ष फुटल्यानंतरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, मराठवाड्यात शिवसेनेला नव्याने उभारी मिळवून देण्यात अंबादास दानवे यांनी महत्वाची भूमिका बजावली हे नाकारून चालणार नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ते पक्ष सोडणार, भाजप, शिंदेच्या सेनेत जाणार, अशा चर्चा अधून मधून झाल्या. पण त्या चर्चाच ठरल्या.
फडणवीसांनी मुळ सांगितले, तर शिंदेंकडून उपकारांची आठवण..
अंबादास दानवे यांच्यासारखा आक्रमक चेहरा आणि संघटन कौशल्यात हातखंडा असलेला मोहरा हाती लागावा यासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. अंबादास दानवे यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तुम्ही मुळ भाजपचे आहात, तुमचा आत्मा हिंदुत्ववादी आहे याची आठवण करून देत पायघड्या घातल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या उपकारांची आठवण करून देत करिअर आणि भविष्यातील राजकीय कारकीर्दीचा दाखला देत दानवे यांना टाळी दिली. आता अंबादास दानवे त्यांचे मुळ असलेल्या भाजपाच्या गळाला लागतात? की मग ज्यांच्या सहकार्याने विधान परिषदेत एन्ट्री आणि नंतर विरोधी पक्ष नेता होण्याची संधी मिळाली त्या शिंदेंच्या टाळीला प्रतिसाद देतात? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
उद्धव ठाकरेंनी दिला निष्ठेचा दाखला..
अंबादास दानवे यांच्यासारखा तगडा नेता पक्ष सोडून जाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सध्या परवडणारे नाही. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी आणि पक्ष फुटीनंतर राज्य पातळीवर काम करण्याची संधी देत विरोधी पक्षनेते पदाची टाकलेली जबाबदारी याची जाणीव दानवे यांना करून दिली. दानवे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करतानाच विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत जशी स्वतःची उंची वाढवली तशी आता निष्ठा दाखवून ती आणखी वाढवा, असा सल्ला दिला. माझ्याकडे सध्या तुम्हाला देण्यासारखे काही नाही, हे ही ठाकरे यांनी स्पष्ट केले. अशावेळी अंबादास दानवे काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.