Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : सिल्लोडला पाकिस्तान म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंचा निषेध का केला नाही? अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना सवाल

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 21 July : भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जेव्हा मुसलमांनाची मते मिळत होती, तेव्हा त्यांना गोड वाटत होतं. आता पराभव झाला तर हे सिल्लोड त्यांना पाकिस्तान वाटू लागलं का? सिल्लोडला पाकिस्तान म्हणल्याचा तुम्ही निषेध का केला नाही, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसैनिकांना विचारला आहे.

शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "भलेही अब्दुल सत्तार यांना उद्देशून रावसाहेब दानवे असे बोलले असतील, पण सिल्लोड पाकिस्तानात आहे का? सिल्लोडला ते पाकिस्तान म्हणाले ते तुम्ही कसे सहन केले? त्यांचा आणि भाजपचा रस्त्यावर उतरून तुम्ही निषेध का केला नाही? रावसाहेब दानवेंना या वक्तव्याबद्दल तुम्ही सिल्लोड बंदी करायला हवी होती.

संघटना मोठी करण्याची एक मोठी संधी तुम्ही घालवली, अशा शब्दात शिवसेना (Shivsena) नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना सुनावले. अशा गोष्टी, विधानांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, त्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, यातूनच संघटना मोठी होत असते," असा सल्ला अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना दिला.

शिवसंकल्प मोहीम 2024 च्या निमित्ताने आयोजित बैठकीत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान करणाऱ्या रावसाहेब दानवेंविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाही? त्यांना सिल्लोड बंदी करायला पाहिजे होती, भाजपच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे होते, ते तुम्ही का केले नाही? असे अनेक प्रश्न शिवसैकांना विचारले.

तसंच राजकारणात अशा संधी येतात तेव्हा त्या आपण घेतल्या पाहिजे. काय घडतंय, कोण काय बोलतंय हे लगेच क्लिक झालं पाहिजे. क्लिक झालं की, आंदोलन करून त्याचा जाब विचारला पाहिजे. अशा घटनांमधून संघटनेला बळ मिळतं, ती मोठी होते. सिल्लोडला पाकिस्तान म्हटले हे तुम्ही सहन करता कामा नये. हे सिल्लोड आमचं आहे, त्यामुळे जो कोणी याला पाकिस्तान म्हणत असेल त्याला तुम्हा जाब विचारलाच पाहिजे.

मुसलमानांची मत तुम्हाला मिळत होती ती कशी गोड लागली? तेव्हा सिल्लोड पाकिस्तान नव्हता का? सरसकट सगळ्या मुसलमानांना तुम्ही पाकिस्तानी कसे म्हणू शकता, असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी बैठकीत उपस्थितीत केला. पाकिस्तान बद्दल प्रेम असणारे काही मुसलमान असतील तर त्याना निश्चित पाकिस्तानात हाकलून द्या, पण देशातील एखाद्या गावाचा, सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून केलेला अपमान कदापी सहन केला जाणार नाही, कोणी करू नये, असे आवाहन अंबादास दानवे यांनी यावेळी केले.

लोकसभेच्या जालना मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमदेवार रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांनी लाखाच्यावर मताधिक्याने पराभव केला. लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पिछाडीवर होते. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात महायुती असूनही मंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे काम न करता काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केल्याचा राग दानवे यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी सिल्लोडचे पाकिस्तान झाल्याची जाहीर टीका केली होती.

यावर शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत बैठकीत अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना अशा मुद्यांवर आक्रमक होऊन आंदोलन करण्याचा सल्ला देत आपली भूमिका व्यक्त केली. अंबादास दानवेंच्या या आक्रमक पावित्र्यानंतर रावसाहेब दानवे काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT