Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Winter Session News: सत्तारांना पुन्हा आठवला ईश्वर, अल्ला, भगवान..

सरकारनामा ब्युरो

Abdul Sattar News: गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या गायरान जमीन वाटप प्रकरणात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सभागृहात आपले म्हणणे मांडले. दोन दिवसांपासून विरोधकांनी (Nagpur) नागपूर खंडपीठाने या प्रकरणी सत्तार यांच्यावर ओढलेल्या ताशेऱ्यांचा दाखला देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेत सभागृह आणि परिसर दणाणून सोडला होता. काल सत्तार सभागृहात आपले म्हणणे मांडणार होते, परंतु कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद विषयावरील ठरावमुळे हा विषय पुढे ढकलला गेला.

आज सभागृहाचे कामकाज (Winter Session) सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या गोंधळ आणि सभात्याग अशा वातावरणात सत्तार (Abdul Sattar) यांनी गायरान जमीन वाटपा संदर्भात स्पष्टीकरण दिले. विरोधकांच्या मागणीला सरकार जुमानणार नाही, असे दिसत होते आणि तसेच घडले देखील. सत्तार यांनी गायरान जमीन वाटपाची या आधीची अनेक उदाहरणे, आपण कोणत्या कागदपत्रांच्या कलमांच्या आधारे जमीनीचे वाटप केले हे शासकीय नियमांचे वाचन करत सभागृहात मांडले.

विशेष म्हणजे नागपूर खंडपीठाने गायरान जमीन वाटप प्रकरणी ताशेरे ओढल्यानंतर सभागृहात उत्तर देतांना सत्तार यांना पुन्हा ईश्वर, अल्ला आणि भगवानची आठवण झाल्याचे दिसून आले. आपण एका दलित, मागासवर्गीय भावाला न्याय दिल्याचा दावा करतांना आपल्याला ईश्वर, अल्ला, भगवानने दिलेल्या बुद्धीने आपण हा निर्णय घेतला, आता कोर्ट जी शिक्षा देईल ती आपल्याला मान्य असेल, असे सांगतिले.

हे सागंत असतांना त्यांनी विरोधी बाकावरील आमदारांवर देखील उंगली निर्देश करत त्यांच्यावर जमीनी हडप केल्याचा आरोप करत आक्रमक रुप देखील धारण केले. परंतु सभागृहात उत्तर देतांना एरव्ही असणारा उत्साह किंवा मुजोरपणा सत्तारांच्या देहबोलीतून दिसला नाही. अब्दुल सत्तार यांचे राजकारण आणि कार्यपद्धती ही मवाळ कधीच राहिली नाही. मनासारखे झाले नाही की अंगावर जाण्याची त्यांची पद्धत जुनीच आहे.

मतदारसंघावर मात्र त्यांची मजबुत पकड आहे. अल्पसंख्याक समाजाचे असून देखील सलग तीन टर्म ते सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून निवडून आले आहेत. राम राम, आदब, जयभीम, सलाम, दुवा, ईश्वर, अल्ला, भगवान हे त्यांच्यासाठी पर्वणीचे शब्द आहेत. आपल्या भाषणातून ते या शब्दांचा वापर करत मतदारांना साद घालत असतात. राजकीय बालंट किंवा संकट आले की सत्तारांना देव आठवतो हे पुन्हा दिसून आले.

नागपूर खंडपीठाने चुकीच्या ठरवलेल्या निर्णयावर आपण ईश्वर, अल्ला आणि भगवानला साक्षी ठेवून जमीन वाटपाचा निर्णय घेतल्याचा दावा सत्ततार यांनी केला आहे. सभागृहात सत्तारांनी आपली बाजू मांडली असली तरी कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार त्यांच्यावर अजून कायम आहे. आता त्यातून सत्तारांना ईश्वर, अल्ला, भगवान वाचवतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT