Congress News : औसा विधानसभा मतदारसंघातील व निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण करण्यात आले म्हणून काँग्रेसने पोलिस अधिक्षकाकडे तक्रार दिली होती. अखेर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या अचनाक प्रगटल्या. 20 गाड्यांच्या ताफ्यासह पोलीस बंदोबस्तात दाखल होत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
चौधरी यांची माघार काँग्रेससाठी धक्कादायक मानली जात आहे. आता त्या प्रवर्गातून भाजप व पर्यायी भाजप असे 2 उमेदवार शिल्लक आहेत. पर्यायी भाजप असलेला उमेदवार सध्या गायब आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक अजूनही कायम आहे. पण ही निवडणूक बिनविरोध होईल की निवडणूक होईल? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
अनुसूचित जमाती महिला गटासाठी राखीव असलेल्या निलंगा तालुक्यातील तांबाळा गटातून अंजना सुनिल चौधरी या उमेदवार होत्या. शनिवारी (ता. 24) रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्या बिदर रोड, उदगीर येथे त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर मतदारसंघात प्रचारासाठी जाण्याचे नियोजन होते.
चौधरी यांना प्रचाराला घेऊन जाण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे (रा. कासार बालकुंदा, ता. निलंगा) हे तेथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर काही वेळाने कोकणे हे बाहेर जाऊन परत आले असता, अंजना चौधरी या त्या ठिकाणी नव्हत्या. उपस्थित नागरिकांकडून चौकशी केली असता, काही अज्ञात गुंडांनी एका वाहनातून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर कोकणे, पक्षाचे कार्यकर्ते व कुटुंबीयांनी चौधरी यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, चौधरी यांच्या निवासस्थानी चौकशी केली असता, त्यांचे पतीही घरी आढळून आले नसल्याने अपहरण झाल्याची शंका अधिक बळावली होती. या घटनेबाबत काँग्रेस नेत्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती देत तक्रार नोंदविली.
लातूर जिल्ह्यात एसटी प्रवर्ग महिलेसाठी एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ असून, अनुसूचित जमातीचे जातपडताळणी पूर्ण झालेले उमेदवार मिळणे प्रत्येक पक्षासाठी आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत अधिकृत उमेदवाराचे अपहरण होणे ही घटना अत्यंत गंभीर व लोकशाहीला घातक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी काँग्रेस नेते अभय साळुंके व ॲड. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक लातूर, मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अंजना चौधरी यांचा तात्काळ शोध घेऊन सुरक्षितपणे ताब्यात द्यावे, अशी मागणी केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय होईल याबाबत मोठी उत्सुकता होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास जवळपास 20 ते 25 गाड्यांचा ताफा घेऊन अंजना चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतला.
आता त्या ठिकाणी भाजपकडून महानंदा तुमकुटे तर पर्यायी भाजपचे उमेदवार मिरा तुबाकले हे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे पर्यायी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली तर इथे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय यामधील आणखी एक उमेदवार गायब असल्याची चर्चा आहे. गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु अंजना सुनील चौधरी यांनी ताफा घेऊन आपला अर्ज माघारी घेतला त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याचा हिरमोड झाला आहे. एक प्रकारे काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.
निलंगा तालुक्यातील तांबाळा गटाच्या उमेदवाराचे झालेली अपहरणाची घटना हे महाराष्ट्र आहे की बिहार? हेच कळत नाही. दिवसा ढवळ्या असा प्रकार अशोभनीय आहे. किती गुंडशाही सुरू आहे, अजून मतदान होणे बाकी आहे तत्पूर्वीच असे प्रकार घडत असतील तर कुठे आहोत आपण? याचा विचार होणे गरजेचे आहे, असा संताप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.