Fadnavis Government : रेल्वे मार्गे असो की रस्ते मार्गे असो, कोकणात जाण्यासाठी प्रवासी आणि पर्यटकांपुढे सदासर्वकाळ अडचणीचा डोंगर पुढे उभाच असतो. या अडचणी सोडवण्याऐवजी फडणवीस सरकारने प्रचंड गाजावाजा करून मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरु केली. पण सुरुवातीपासूनच हा प्रकल्प आतबट्ट्याचा व्यवहार ठरला.
रिकाम्या रो-रो फेऱ्यांवर सरकारचा पैसा वाया जात होता. तरीही एका मंत्र्याच्या प्रतिष्ठेसाठी अल्प प्रवासी असतानाही प्रचंड तोटा सहन करून हा 'पांढरा हत्ती' पोसण्याचा प्रयत्न सरकारने चालूच ठेवला होता. शेवटी तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन फेऱ्या किंबहुना ही सेवाच अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.
मुंबई-विजयदुर्गच्या १२ फेऱ्यांमध्ये फक्त ८९४ प्रवासी आणि १५४ वाहने वाहतूक करू शकली. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही फेऱ्यांत जहाज अक्षरशः रिकामे धावले. फक्त काही मंत्र्यांच्या हट्टामुळे हा अव्यवहार्य प्रकल्प लादल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रिकाम्या फेऱ्यांचे वास्तव :
ब्बल ६२० प्रवासी क्षमतेच्या जहाजेमध्ये ५ मार्चच्या विजयदुर्ग-मुंबई फेरीत एकही प्रवासी नव्हता. १९ मार्चच्या फेरीत केवळ एकच प्रवासी होता. तर बहुतांश फेऱ्यांमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. उद्घाटनाच्या पहिल्याच फेरीत ४१३ प्रवासी दाखवत मोठ्या यशाचा दावा करण्यात आला होता; मात्र या सेवेला मिळणारा प्रतिसाद सातत्याने घसरत गेला.
तोट्याचे गणित :
'इकोनॉमी' तिकीट दराची ३ हजारांपासून सुरू होते. सर्व प्रवाशांनी किमान तिकीट दर भरला आणि वाहनांचे सरासरी भाडे मिळाले असे धरले तरी, एकूण उत्पन्न ३५ ते ३६ लाखांच्या आसपास जाते. या फेरीसाठी केवळ इंधन खर्च किमान १.१५ ते १.४० कोटी रुपयांच्या घरात जातो. या सगळ्याच्या तुलनेत रेल्वे किंवा खासगी बस हा पर्याय त्रासदासक वाटत असला तरी अधिक स्वस्त ठरतो.
याबद्दल बोलताना अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव, अक्षय महापदी यांनी सरकारवर टीका केली. "जनतेच्या खऱ्या गरजा दुर्लक्षित करून अशा तोट्यातील योजनांवर पैसा खर्च करणे म्हणजे प्राधान्यक्रमांचा घोळ आहे. प्रलंबित मूलभूत कामांकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे." असा आरोप त्यांनी केला.
तोट्यातील गणिताची आकडेवारी :
एकूण फेऱ्या: १२
एकूण प्रवासी: ८९४
एकूण वाहने: १५४
एका फेरीसाठी इंधन: १८ ते २० हजार लिटर
अंदाजित उत्पन्न: ३५ ते ३६ लाख
एकूण खर्च: दीड ते पावणेदोन कोटी
अंदाजित थेट नुकसान: १.१५ ते १.४० कोटी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.