Mumbai News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपनं मंगळवारी(ता.28) यादी जाहीर करताच 24 तासांच्या आतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपलाही उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेनं दानवेंची घोषणा करतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही मोठा धक्का दिला आहे. यामुळे मविआत फूट पडल्याची चर्चा असून या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती.सध्याचं विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येत आहे. ही जागा उद्धव ठाकरे लढवतील असं बोललं जात होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तसेच संकेत दिले होते.
विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी कोणतीच भूमिका बुधवारपर्यंत जाहीर केली नव्हती. मात्र,अर्ज दाखल करण्यासाठी काही तास उरले असताना अंबादास दानवेंचं नाव उमेदवारीसाठी पुढं आणत सर्वांनाच धक्का दिला. पण यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस ट्विस्ट आणणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट दिल्लीत पोहचले असून त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीची विधानपरिषदेची जी एक जागा रिक्त झाली आहे, ती ठाकरे निवृत्त झाल्यामुळेच आहे. त्यामुळं या जागेवर शिवसेनेचाच सर्वाधिक हक्क होता. पण सुप्रिया सुळेंनीही शिवसेनेतील इतर नेत्यांच्या नावाला नव्हे,तर उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पाठिंबा जाहीर केला होता. शरद पवार यांनी ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे कोणते नाव येईल, त्याला आमचा पाठिंबा असेल असे जाहीर केले होते.
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा आहेत,अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. म्हणजेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीनं पडद्यामागं राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. उद्धव ठाकरे जर विधानपरिषद निवडणूक लढवणार असतील,तर त्यांचे स्वागतच आहे आणि त्यांना आमचा पाठिंबा असेल,असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी पुढे जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील किंवा ते निवडणूक लढवणार नसतील, तर ती जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळावी,अशी मागणी केली होती. या जागेवर मविआचा उमेदवार कोण असेल यावर आघाडीत चर्चा करावी लागेल,असंही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या जागी अंबादास दानवे यांना संधी दिली आहे. दानवे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेकदा महायुती सरकारला विविध मुद्द्यांवरुन खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मराठवाड्यात एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ठाकरेंनी दानवेंच्या रुपानं एक जशास तसा आणि लढवय्या नेत्याला संधी देत मोठा डाव टाकला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.