Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पत्र सोशल मीडियात शेअर केले आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात राज्यातील विकासकामांसह विविध घडामोडींचा उल्लेख करत कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे दिवंगत अजित पवार आणि आशा भोसले यांचीही आठवण पंतप्रधानांनी काढली आहे.
पंतप्रधानांनी पत्रात हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत विशेष वर्ष असल्याचे म्हटले आहे. आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती, महात्मा फुले यांची २०० वी जयंती, संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती, महाड इथल्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची १० वर्षे साजरी करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून समर्पित करणे हे अत्यंत समर्पक आहे, असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
तीन बाबींचा आनंद
मला वैयक्तिक पातळीवर अत्यंतिक आनंद देणाऱ्या तीन बाबी आहेत. पहिली बाब म्हणजे मराठा साम्राज्याच्या १२ किल्ल्यांचा, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश. दुसरी बाब म्हणते, २०२४ मध्ये सुंदर मराठी भाषेचा अभिजात भाषांच्या यादीत समावेश करण्याचा सन्मान आमच्या एनडीएला सरकारला मिळाला. आणि तिसरी बाब म्हणजे, गेल्या वर्षी संविधान दिनानिमित्त पॅरिसमदील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण, असे पंतप्रधान मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या पत्रात देशाच्या आर्थिक परिवर्तनात महाराष्ट्राच्या योगदानाचाही उल्लेख केला आहे. महाराष्ट्राने नेहमीच महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारचे पाठबळ पूर्वीपेक्षा अधिक बळकट असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी पत्रात केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागील कार्यकाळातील कामांचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. आगामी कुंभमेळ्यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अजितदादांची आठवण
महाराष्ट्रातील जनतेसाठी २०२६ या वर्षात काही दु:खद घटना देखील घडल्या आहेत. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आशा भोसले यांना देखील आपण गमावले आहे. त्यांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांच्या आठवणी कायम लोकांना प्रेरमा देत राहतील, अशी मला खात्री आहे, अशी भावना पंतप्रधानांनी पत्रात व्यक्त केली आहे.
विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनण्याच्या आपल्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. या महाराष्ट्र दिनी, आपण आधुनिक महाराष्ट्राच्या असंख्य निर्मात्यांचे... कामगार, शेतकरी, संत, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक, ज्यांच्या श्रमामुळे हे राज्य असामान्य बनले आहे, त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो. राज्याला सर्वतोपरी पाठबल देण्याच्या आमच्या वचनबध्दतेचा आम्ही पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.