Jitendra Awhad On Shri Ram Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad Controversy : माझ्यावर गुन्हा दाखल करा, वाल्मीकींचे काय? जितेंद्र आव्हाडांचे महंतांना आव्हान

Pradeep Pendhare

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानावर ठाम आहेत. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली. हे करताना आव्हाडांनी वाल्मीकी रामायणाचा दाखला दिला आहे. मी जे काही बोललो आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गुन्हा दाखल करायचा असेल, तर करा. मी घाबरत नाही. परंतु ज्यांनी लिहिले आहे, त्या वाल्मीकींचे काय? मग गुन्हा कोणावर दाखल करायचा ते ठरवा, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते दोन दिवसांपासून शिर्डीत आहेत. अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता. आव्हाड यांनी त्यांच्या भाषणात प्रभू श्रीराम बहुजनांचा होता, तो मांसाहार करायचा. शिकार करायचा, असे म्हटले होते. आव्हाडांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटले असून, भाजपसह (BJP) हिंदुत्ववादी संघटना निषेध नोंदवत आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या मुद्यावर ठाम राहिले. परंतु ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर खेद व्यक्त करतो, असे म्हणत पुराव्यानिशी केलेल्या विधानावर ठाम राहिले. मला वाद वाढवायचा नाही. परंतु कोणाला वाढवायचे असेल, तर वस्तूस्थिती स्वीकारण्याची तयारी ठेवत माझ्यासमोर या. त्याचे पुराव्यानिशी उत्तर देतो, असे आव्हान आव्हाडांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. मला भाषण स्वातंत्र्य आहे. वाल्मीकींनी जे लिहिले आहे, तेच मी बोलतोय. मग गुन्हा कोणावर दाखल करायचा ते ठरवा. मला यावर बोलायचे नाही. पुन्हा यातून वाद होतील. मी गुन्ह्यांना घाबरत नाही. वस्तुस्थितीवर बोलायचे असले, तर समोर या."

सुधीरदास यांच्यावर टीका

राज्यातील हिंदू धर्माचे महंत आक्रमक झाले असून, त्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे, त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, कोण मागणी करीत आहे, ते मला माहिती आहे. मी गुन्ह्यांना घाबरत नाही. ते सुधीरदास ना! ज्यांनी कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का, पौराणिक या वादात अडकवले होते ते ना! शाहूमहाराजांबरोबर झालेला वाद होता. वेदोक्त की, पुराणोक्त, हा वाद झाला होता. त्यावेळी महाराणींना तुमची वेदोक्त नाही, तर पुराणोक्त पूजा होईल, असे म्हणालेले सुधीरदास. अजून खूप काही गोष्टी त्यांच्याविषयी सांगण्यासारख्या आहेत. पण मी त्या संतमाणसाचा आदर करतो. रामकृष्ण हरी! मी आज काही बोलणार नाही. त्यांच्या डोक्यात आजही वेदोक्त आणि पुराणोक्त बसलेले आहे आणि वर्णव्यवस्था बसलेली आहे. त्यांच्याविषयी काय बोलणार, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना फटकारले.

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनमध्ये लॉक करून ठेवलंय...

आमचा राम हा बहुजनांचा राम आहे. मी रामभक्त आहे. अयोध्येला रामदर्शनाला जाणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारात उभा राहणारा आमचा राम आहे. आता महिलांवर होत असलेला अत्याचार पाहून राम आले, तर ते निघून जातील. आदिवासींचा राम आहे. शबरीचा राम आहे. जेव्हा राम येईल, तेव्हा दौप्रदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनमध्ये लॉक करून ठेवले आहे, ते पाहून काय वाटेल, असे मुद्दे उपस्थित करीत भाजप सत्ताधाऱ्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवला.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT