Mahayuti government controversy : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेतील जवळपास 26 लाख 34 हजार लाभार्थी बोगस असल्याचे सांगून महायुती सरकारने ते वगळले आहे. लाडक्या बहिणींना बोगस म्हटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
'गरज संपल्याने आता लाडकी बोगस झाली आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही', अशी मोठी भविष्यवाणी रोहित पवार यांनी करून महायुती सरकारला डिवचलं आहे.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) राबवला. त्याचा गैरफायदा घेतणाऱ्यांविरोधात सरकारने मोहीम राबवली. त्यात जवळपास 26 लाख 34 हजार लाभार्थी बोगस आढळले. राज्यातील महायुती सरकारने या लाभार्थ्यांचा सन्मान निधी वगळण्याचा निर्णयावर जूनपासून कारवाई सुरू केली आहे. राज्य सरकारची या लाभार्थ्यांनी फसवणूक केल्याची आता म्हटले जावू लागले आहे.
महायुतीच्या या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत, महायुती सरकारला डिवचलं आहे. ''गरज सरो वैद्य मरो' याप्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुका होताच, या सरकारला परकी वाटायला लागली असून, एक ना अनेक कारणं काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्याचे काम महायुती सरकारने चालवले आहे', असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
'आपल्या राजकीय स्वार्थापायी अगोदर बहिणींना लाडकं म्हणायचं, आणि स्वार्थ साधून झाला की, त्यांनाच 'बोगस' करायचं हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि 1500 चे 2100 रुपये करण्याचे दिलेले आश्वासन अमलात आणावे, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाहीत,' अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केली.
माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसीपद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लडक्यां'मध्ये शहरी भागातील बोगसचे प्रमाण जास्त आढळते आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी हा बोगस लाभार्थींची प्रकार म्हणजे मोठा घोटाळा आहे. बोगसच्या नावाखाली या योजनेत 400 कोटींच्या वर घोटाळा असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी करत या योजनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.