Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यांनतर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनकाळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीच एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी राबविणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार त्यांच्या गळाला लागणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे या दिल्ली दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली नव्हती, असे पुढे आले होते. मात्र, आता गेल्या महिन्यात अमित शाह यांनी त्यांची भेट का टाळली होती, त्याचे मोठं कारण समोर आले आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17 मार्चला दिल्लीत आले होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा रंगली. त्याद्वारे शिंदे गटाकडून ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रत्येकी सहा खासदार फोडले जाणार असल्याची कुजबुज सुरू झाली. मात्र, आमचा एकही खासदार फुटणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटातील सहा खासदार फुटणार असल्याचा दावाही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी फेटाळून लावला.
त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला ब्रेक लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येकी सहा खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. या खासदारांना त्यांच्याकडे खेचून केंद्रातील दोन मंत्रिपदे आपल्या पदरात पाडून घेण्याची शिंदे यांची तयारी होती. मात्र, या सगळ्याला भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अचानक रेड सिग्नल दिल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी राबवण्याची मोठी तयारी केली होती. शिंदे गटाला केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे हवी असून, त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे ही दोन्ही मंत्रिपदे मिळवण्यासाठी शिंदे गटाने ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी सहा खासदार फोडण्याची तयारी दर्शवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये भाजपाकडे सर्वाधिक 240 खासदार आहेत. त्यांना चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचे 16 आणि नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या 12 खासदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय शिंदे गटाच्या सात खासदारांचाही केंद्र सरकारला पाठिंबा आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटासह शरद पवार गटाचे प्रत्येकी सहा असे 12 खासदार जर शिंदे गटाच्या गळाला लागले असते, तर त्यांच्या खासदारांची संख्या 19 पर्यंत पोहोचली असती. मात्र, भाजपने सध्या तरी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला रेड सिग्नल दिला असल्याचे समजते. तर दुसरीकडे याच कारणामुळे दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नसल्याचे कारण पुढे आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.