Pankaja Munde News
Pankaja Munde News Sarkarnama
महाराष्ट्र

Pankaja Munde and Rajyasabha : पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चिन्हं; फडणवीसांची अमित शाहांशी झाली चर्चा?

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातून निसटत्या पराभवास सामोरं जावं लागलेल्या पंकजा मुंडे यांची आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून पंकजा मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं गेल्याची माहिती समोर आली आहे.

एवढंच नाहीतर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लावली जावी यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा केल्याचीही चर्चा आहे.

पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचा लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवरा पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. परंतु हा निसटता पराभव पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या सहन झालेला दिसत नाही. कारण, मागील काही दिवसांत पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे दु:ख सहन न झाल्याने काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलल्याचं दिसून आलं आहे. पंकजा मुंडे यांनीही वारंवार असं टोकायंच पाऊल उचलू नका असं कळकळीचं आवाहन केलेलं आहे.

काही दिवस अगोदर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीस पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा नेमका कशामुळे फटका बसला आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनिती असेल, याच्या रोडमॅपवर तेव्हा प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याच्या चर्चांवर सकाळ समूहाच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानीवाडेकर यांनी साम मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना, भाजपला महाराष्ट्रातील सामाजिक ताण्याबाण्यांचा विचार करावा लागणार आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज भाजपपासून काहीसा दुरावला जरी गेला असला तरी, तर ओबीसी समाज जो कायम भाजपचा पाठिराखा राहिला आहे. त्यांना जवळ करणं आणि तुम्ही आमचे आहात हे दाखवणं गरजेचं आहे.

त्या समाजाचे गोपीनाथ मुंडे हे नेते आहेत आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्या समाजात असलेला आदर पंकजा मुंडे यांची आक्रमक प्रतिमा हे लक्षात घेता, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाला विशेष करून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना त्या राज्यसभेत असाव्यात, त्यांना मानाचं पद दिलं जावं असं गरजेचं वाटत असावं.'

तसेच, 'आपण काही दिवसांमध्ये बघितलं की लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांनी अगदी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊलही उचललं. पंकजा मुंडे यांची लोकप्रियता आणि त्यांच्या चेहऱ्याची गरज ही हे आंदोलनं दर्शवत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर राज्यसभेवर घ्याव आणि मानाचं पद द्यावं, अशी फडणवीसांची इच्छा दिसत आहे.' असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय 'लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस हे काहीसे राजकारणाची नव्याने रचना करताना दिसत आहेत. ती रचना करताना त्यांना जुने साथीदार, विशेष करून ब्राह्मणेत्तर समाजाचे नेते आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना कायम प्रोत्साहन देतो असंही दाखवणं गरजेचं झालं असावं.

पंकजा मुंडे यांना विधानसभेवर किंवा राज्यसभेवर घ्या, अशी विनंती महाराष्ट्र भाजप आणि फडणवीसांनी तीनदा केली होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाला वाटत होतं की त्यांनी जनतेमधून निवडून यावं. मात्र यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाल्याने आता त्यांच्या पुनर्वसनासाठी आता राज्यसभेवर वर्णी लावण्याची गरज महाराष्ट्राला वाटत असावी.' असं मृणालिनी नानीवाडेकर यांनी म्हटलं आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT