Karad, 15 June : सातारा गॅझिटियरसाठीच यावेळचे आंदोलन मी उन्हात केले. त्यासाठी सरकारने एक महिन्याचा कालवधी मागीतला आहे, मी दोन महिन्याचा घ्या, असे सांगीतले आहे. मात्र त्यानंतर निघणारा मराठा समाजाचा अद्यादेश पक्का काढण्यात येणार असून त्यामध्ये कसलीही हालचाल करता येणार नाही. त्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
कोल्हापुरहून कऱ्हाडवरुन शहापूरकडे (जि. सातारा) रवाना होण्यापूर्वी जरांगे-पाटील यांनी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह नगरसेवक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, पदाधिकारी, मराठा बांधव-भगिणी यांनी जरांगे-पाटील यांचे स्वागत केले.
कोल्हापूर संस्थानचे गॅझेटीयर मागून घेऊन अहवाल तयार करा, असे मी आत्ताच मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना फोनवरुन सांगीतले. मंत्री विखे-पाटील यांनी आयुक्तांना सांगून तत्काळ गॅझेट मागवून घेऊन अहवाल तयार करायला सांगतो, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यावरून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही जरांगे यांनी नमूद केले.
जरांगे-पाटील म्हणाले, पूर्ण मराठा समाज आरक्षणात घालणारच आहे. जोपर्यत मराठा समाज आरक्षणात जात नाही; तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सातारा गॅझेटीयर लागू करण्यासाठीच मी मध्यंतरी उन्हात बसून आंदोलन केले. त्या गॅझेटीयरसाठी ॲडव्होकेट जनरल, तज्ज्ञांशी चर्चा करायची असल्याने सरकारने एक महिन्याचा त्यासाठी वेळ मागीतला आहे.
त्या गॅझेटीयरच्या १५ लाख नोंदी आहेत, त्यामुळे त्यांनी एक महिन्याचा वेळ मागितला, मी त्यांना दोन महिने घ्या असे सांगीतले आहे. आरक्षण ७० वर्षे नव्हते, त्यामुळे आता दोन महिने गेले तरी काही अडचण नाही. परंतु मराठा समाजाचा आध्यादेश चांगला पक्का निघणार आहे. सरकारने वेळकाढुपणा करणे हे कामच असते. मात्र मी सरकारला वेळकाढूपणा करुन देणार नाही. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४२ लाख मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे घटनेत, कायद्यात त्यांना ते बसवायला लागणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरु आहे.
तीन वर्षांनी कऱ्हाड भेट
मनोज जरांगे-पाटील हे २०२३ मध्ये पहिल्यांदा कऱ्हाडला आले होते. त्यावेळची त्यांची मध्यरात्री झालेली सभा गाजली होती. त्यानंतर तीन वर्षांनी जरांगे-पाटील यांचे कोल्हापूरहून कऱ्हाडला आगमन झाले. त्यांचे पाचवड फाटा, आटके टप्पा, जखिणवाडी, कोयना वसाहत, मलकापूर, कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा कॅनाल आदी ठिकाणी मराठा बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.