Kolhapur News : गेल्या पाच महिन्यापासून लागू असलेली किल्ले विशाळगडावरील संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.7) जारी केला असून काही अटी आणि शर्तींचे पालन करून पर्यटकांना किल्ले विशाळगडावर जाता येणार आहे.
किल्ले विशाळगडावरील अनधिकृत बांधकामे आणि येथील मशीद बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे विशाळगड सह आजूबाजूच्या गावांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी गडावरील नागरीकांनी संचारबंदी उठवण्याची मागणी करत धरणं आंदोलन केले होते. अखेर सरकारकने याचे गंभीर्याने दखल घेऊन गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे. दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून तब्बल पाच महिन्यानंतर विशाळगड पर्यटकांना खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे. पर्यटकच या आजूबाजूच्या गावांचा उत्पन्नाचा साधन आहेत. त्यामुळे संचार बंदी उठवावी अशी मागणी किल्ले विशाळगडावरील आणि आजूबाजूतील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीचा विचार करताना जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश शिथिल करत 31 जानेवारीपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्याचा मार्ग खुला केला आहे.
जिल्हा प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना आणि देवदर्शनासाठी खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गडावर पर्यटकांना दहा ते पाच या वेळेतच सोडले जाणार आहे. कोणत्याही नागरिकांना पाचनंतर विशाळगडावर मुक्काम करता येणार नाही. किल्ल्यावरील धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान किल्ले विशागडावर कोणालाही मासाहर पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत किंवा शिजवून खाता येणार असे ही नियम आणि अटी शर्तीत मुद्दा आहे.