Sharad Pawar, Amol Kolhe, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe vs Ajit Pawar : गुरूला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देता; रामनाम घेत कोल्हेंचा अजितदादांवर बाण

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : राम मंदिराची चर्चा सुरू आहे. राम म्हणजे आमची मक्तेदारी आहे, असे काही राजकीय पक्ष म्हणतात. प्रभू श्रीराम जेवढे तुमचे आहेत, त्यापेक्षा जास्त आमचे आहेत. चार खांद्यावर जाताना आम्हीही श्रीराम जय राम, जय जय राम म्हणतो. मात्र, आमच्या मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत, तर आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल श्रीराम आहेत. राम राम म्हणत आम्ही माणूस जोडतो, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनात अमोल कोल्हेंनी खणखणीत भाषण केले. या भाषणात अमोल कोल्हेंनी भाजप आणि अजित पवारांवर निशाणा साधला.

'प्रभू श्रीराम तुम्हाला कसे पावतील?'

श्रीराम हे एकवचनी, एकबाणी होते. पण आधी वचन द्यायचे आणि नंतर चुनावी जुमला था, असे म्हणणाऱ्यांना श्रीराम कसे पावतील? श्रीरामांनी लंकेला जाऊन सीतामाईंना सोडवून आणले. स्त्रीशीलाचे रक्षण करणारे श्रीराम होते. पण दिल्लीत आमच्या महिला कुस्तीपटूंवर ओढवलेली भयंकर परिस्थिती पाहिली. त्यांना कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल, तर महिलांचे शोषण करणाऱ्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? अशी खोचक सवाल कोल्हेंनी केला.

प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला तो पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी. पण आपल्या पितृतुल्य गुरूला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? हा महत्त्वाचा सवाल आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कांचनमृगाला 50 खोक्यांचे जॅकेट'

सीताहरण झाले दंडकारण्यात म्हणजेच महाराष्ट्राच्या भूमीवर. सीतामाईचे हरण झाले त्यावेळी कांचनमृग होता. कांचनमृगापाठी राम धावायला लागला. आता कांचनमृगाचं रुपडं बदललं आहे. कांचनमृगाला सोन्याचं कातडं नाही, तर त्याला 50 खोक्यांचे जॅकेट घातले आहे. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते. तशी ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्सपासून अभयाची कस्तुरी आताच्या कांचनमृगाकडे आहे. रामायणात सीतामाईचे हरण झालं होतं. आता पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय. पण फक्त पक्ष आणि चिन्हाचं नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा अजित पवारांवर घाणाघात केला.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT