Nana Patole-Ambadas Danve-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 August : मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी कोणाचेही नाव घोषित करा, त्याला माझा पाठिंबा असेल, असे म्हटले, तर नाना पटोले यांनी ‘मुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न नेतेमंडळी बसून सोडवतील’ असे सांगितले होते. त्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेच्या संघटनात्मक कामासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. पत्रकरांशी संवाद साधताना दानवे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून मित्रपक्ष काँग्रेसच्या समाचार घेतला.

मुख्यमंत्रिपदाच्या (Chief Ministership) चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप आहे, ते आम्हाला चालणार नाहीत, असे काँग्रेसने जाहीर करावं, असे आव्हान देताना उद्धव ठाकरे यांच्या मागे जनमत आहे. ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे. उलट महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही, अशा शब्दांत त्यांनी मित्रपक्ष काँग्रेसला फटकारले.

महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत आत्ताच बोलणे योग्य नाही. असे अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच सुनावले. ठाकरेंच्या उमेदवारी आक्षेप असेल तर तसे स्पष्टपणे सांगण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकार पुरस्कृत जाहिरातबाजी करून महिलांना एकत्रित केलं जात आहे. लाडक्या बहिणीला धमक्या आणि प्रलोभन दाखवत आहेत. लाडक्या बहिणींना थेट मदत करायची होती. सरकार त्यांना भीक देत आहे का? असा सवालही दानवे यांनी केला.

नाशिक दंगलीवरून अंबादास दानवे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, हिंदू आक्रोश मोर्चात कोण सहभागी होते, ते आधी पाहा. शिवसेना हिंदुत्ववादी आहे. आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे मग आक्रोश कोणाकडे करायचा? त्यामुळे काय करायचं आहे, ते सरकारने करायचं आहे. मात्र, या दंगली सरकार पुरस्कृत आहेत.

राज्य सरकारला त्यांच्या कामावर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना दंगली घडवून मतांची विभागणी करायची आहे. राज्य सरकारला हिंदू-मुस्लिम करून मतांची विभागणी करायची आहे, त्यामुळे दोघांनीही सावध राहिले पाहिजे, असा सल्लाही दानवे यांनी दोन्ही समाजाला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT