Solapur, 18 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची सुरुवात १६ मतांपासून झाली आहे. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्यामागे होती, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘वसंत’ शंभर टक्के बहरणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. कोणाच्या इगोमुळे इलेक्शन लागलं, हे सत्ताधारी आमदारांना विचारावं, असंही ते म्हणाले.
धैर्यशील माेहिते पाटील म्हणाले, आमची सुरुवात 16 मतांपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्यामागे होती, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. यंदाच्या निवडणुकीत वसंत बहरणार आहे, त्यामुळे आमचे उमेदवार वसंत देशमुख हे शंभर टक्के विजयी होतील.
उत्तम जानकर यांचा विषय हा आमच्या घरातील आहे, त्यामुळे आम्ही तो घरात बसून संपवू. राष्ट्रवादीचे आमदार हे आमच्या घरातील आहेत. आम्हाला घरात बसून भांडण मिटवायची सवय आहे. आता काही भावकीला बाहेर बोलायची सवय असते, ते बोलले असतील. येत्या २२ तारखेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार सगळ्यांना बोलवतील, साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू, असे मोहिते पाटील म्हणाले.
मालकांपाशी आपलं दुकान चाललं पाहिजे, त्यासाठी काही लोक कायम मोहिते पाटलांवर बोलत असतात, अशा शब्दांत माजी आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली. राजेंद्र राऊतांची सभा अकलूजमध्ये होणार का, या प्रश्नावर आमचा वसंताचा बहर संपूर्ण जिल्हाभर झाला आहे आणि कोणाची सभा अकलूजला होणार, असे उत्तर मोहिते पाटील यांनी दिले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे राजकारणात नवीन आणि लहान आहेत. लहान मुले बोलतात, त्याप्रमाणे ते बोलत असतात. मी हरहर महादेव स्टेट्स ठेवले, कारण मावळ्यांचे मनोबल वाढावे; म्हणून मी स्टेटस ठेवले. हरहर महादेवचा अर्थ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना कळला नाही. ते फक्त मतांच्या राजकारणासाठी वापर करतात. अदृश्य शक्ती काम करत होती, त्या शक्तीला धाडस यावं, यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेले हे वाक्य आम्ही स्टेटस ठेवले.