Vaibhav Patil-Gopichnad Padlkar
Vaibhav Patil-Gopichnad Padlkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khanapur-Atpadi Assembly : पडळकरांनंतर राष्ट्रवादीच्या वैभव पाटलांचा खानापूरमध्ये शड्डू; शिंदे गटाचे काय होणार?

Vijaykumar Dudhale

Sangli, 18 June : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे. वैभव पाटील आणि पडळकर यांनी खानापूर-आटपाडीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे. खानापूर-आटपाडीतील उमेदवारीवरून महायुतीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

वास्तविक, खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर (Anil Babar) आमदार होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)-वैभव पाटील (Vaibhav Patil) यांच्या भूमिकेमुळे खानापूर-आटपाडी मतदारसंघात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, भविष्यातील राजकारणात एक विचारधारा, पक्षाचे धोरण म्हणून खानापूर-आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आम्हाला मिळावी, आम्ही प्रामाणिकपणे काम करू. लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करता यावं, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढील काळात काम करीत राहणार आहोत.

पाटील म्हणाले, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील काही प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. येत्या तीन ते चार महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका घेऊन जास्तीत जास्त लोकसंपर्क करणे, जे प्रश्न सोडविण्यायोग्य आहेत, त्याचा पाठपुरावा करणे, सरकारचा उपयोग करून जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत खानापूर-आटपाडी मतदारसंघात सकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्या दृष्टीने माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत, असेही पाटील यांनी नमूद केले.

वैभव पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काय झाले, का झाले. यातून शिकून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. संघटना बळकटीकरणाचे काम यापुढे करावं लागणार आहे. काही कार्यकर्त्यांनी वेगळ्या विचारधारेमध्ये त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतल्या आहेत. त्या कार्यकर्त्यांना पुन्हा मूळ पदावर आणणे, त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचे काम आगामी काही दिवसांत केले जाणार आहे.

मागील काळात जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण झालं. काहींनी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे काही वेगळे निर्णय घेतले. काही लोकांना त्रास झाला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत, त्यामुळे काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण, ते आपल्याला सोडून गेले, असं होत नाही, असेही पाटील म्हणाले.

ते म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी अगोदर जे प्रश्न आमच्या कानावर येत होते, जे आम्हाला दिसत होते, ते सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तर सांगली लोकसभा निवडणुकीतील निकाल आज वेगळा दिसला असता. आता तरी ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न महायुतीमधील सर्व पक्षांनी केले पाहिजेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT