Indrayani River Flood : राज्यात विविध भागांत पावसाचा जोर सध्या कमी होताना दिसत असला, तरी अनेक ठिकाणी अद्याप पाणी ओसरलेले नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासह श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (आळंदी)च्या विश्वस्तांनी आळंदीकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी आणि भाविकांनी आळंदीकडे येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
तसेच, केवळ १,६६० व्यक्तींच्या मर्यादित उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला असून वारकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
आळंदीत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सद्यस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले असून इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आळंदी येथे येणे सध्या सुरक्षित नाही. तसेच, पूरस्थितीमुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे अशक्य असल्याने श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना आळंदी येथे न येण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे. फडणवीस यांनी वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुणे येथे येऊन पालखीसोबत मार्गस्थ होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाने हे आवाहन वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून माजी आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. त्यात मिटकरी यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्र राज्याची व मराठी मातीची धार्मिक अस्मिता म्हणजे पंढरीची वारी! 'ज्ञानोबा तुकोबांच्या' पालखी प्रस्थान सोहळ्याशिवाय वारी सोहळा अपूर्णच!
केवळ पावसाचे निमित्त करून देहू-आळंदीत येण्यापासून वारकऱ्यांना रोखण्याचा प्रशासनाचा अपराध व तशी हिम्मत आणि उन्मत्तपणा मी तरी पहिल्यांदाच पाहिला. शेकडो उन्हाळे, पावसाळे व असंख्य महामारीची संकटे आषाढी वारीने पाहिली व भोगली आहेत. तिला पाऊस नवा नाही.
इंद्रायणी कोपली ती केवळ कंत्राटदार, उद्योजक व त्यांना मिळणाऱ्या राजाश्रयामुळे; मात्र परिणाम भोगले वारकऱ्यांनी! 'विकास' नावाचा गोंडस भस्मासुर यावेळी पवित्र वारीच्या आड आलाय, पण पांडुरंग माफ करणार नाही, हे 'विकासाने' लक्षात ठेवावे. तुकोबांची गाथा तारणारी इंद्रायणी आम्हाला तारणार नाहीच...
दरम्यान, मिटकरी यांनी "विकासाने" हा शब्द नेमका कोणासाठी वापरला आहे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असून त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.