Dr. Sujay Vikhe Patil, Vijay Auti, Rahul Shinde, Ganesh Shelke
Dr. Sujay Vikhe Patil, Vijay Auti, Rahul Shinde, Ganesh Shelke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने नव्हे, चुकीच्या व्यक्तीच्या येण्याने वाईट बदल घडतो

अमित आवारी

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील एका कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पारनेरमध्ये मागील अडीच वर्षांत झालेल्या बदला बाबत चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी पारनेरचे माजी आमदार नंदकुमार झावरे, वसंत झावरे, विजय औटी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. ( Bad change happens when the wrong person arrives )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, पारनेर तालुक्यात राहुल शिंदें सारख्या युवकाला कधी संधी मिळणार नाही का असा मला प्रश्न पडतो, असा युवक जो सुसंस्कृत कुटुंबात वाढला. ज्याचे शिक्षण चांगले झाले. ज्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. ज्याची सर्वसामान्यांसाठीची धडपड, प्रयत्न करणाऱ्या युवकाला पारनेर तालुक्यात कधी स्थान मिळत नाही, याचे दुःख आहे.

ते पुढे म्हणाले की, पारनेर तालुक्यात मागील दोन वर्षांत जो बदल पहायला मिळाला. राजकारणात सत्ता बदलल्यानंतर पारनेरमध्ये अनेक गोष्टी बदलल्या. मी पूर्वी पारनेर तालुक्यात गाडीतून खाली उतरलो की कोणी पाया पडत नव्हते. मात्र आता गाडीतून खाली उतरलो की सगळे जण पाया पडायला लागतात. मी विचार केला दोन वर्षांपूर्वी कोणी पाया पडत नव्हतं. आता कोणीही पाया पडतं. हा या तालुक्याचा नवा कायदा असावा. ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडणे ठिक आहे मात्र 65 वर्षांच्या व्यक्तीने 40 वर्षांच्या व्यक्तीच्या पाया पडणे हे फक्त पारनेर तालुक्यात पहायला मिळते, असा टोला खासदार विखे पाटील यांनी लगावला.

मागील दोन वर्षांत सर्वात जास्त धंदा केकवाल्यांचा झाला. या आधीही तालुक्यात लोक जन्माला आले होते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस कधीही साजरे झाले नाहीत. केकवाल्यांच्या खपात 25 टक्क्यांनी वाढ झाली. स्व. माजी खासदार बाळासाहेब विखे, माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील व आई शालिनी विखे पाटील या सांगायच्या की जिल्ह्यातील वैचारिक दृष्ट्या सक्षम, सुशिक्षित लोकांचा तालुका हा पारनेर तालुका आहे. आज पारनेर तालुक्याच्या वैचारिकतेच्या परिभाषेत बदल दिसून येत आहे. या बदलाला उत्तर देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या तालुक्यात अधिकारी सुरक्षित नाही तिथे सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा काय दावा करावा. हा विषय आमदार-खासदारकीच्या पुढे आहे. हा विषय पारनेर तालुक्यातील युवकांना, मुलींना आपण काय भविष्य देऊ इच्छितो हा त्या भविष्याचा विषय आहे. एक व्यक्तीच्या जाण्याने फरक पडत नाही. मात्र एका चुकीच्या व्यक्तीच्या येण्याने मोठा वाईट बदल घडतो. हे पारनेर तालुक्यात सिद्ध झाले आहे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी आमदार विजय औटी, भाजपचे युवा नेते राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जयश्री थोरात, किरण कोकाटे आदी उपस्थित होते.

मी शिवसैनिकांच्या पाठीशी

विखे गटाचे कार्यकर्ते डॉ. भास्करराव शिरोळे यांना विजय औटींनी शिवसेनेत नेले. असू द्या. मला खासदार करण्यात 50 टक्के वाटा हा शिवसैनिकांचा आहे. मागील तीन वर्षांत माझे एकही वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मातोश्री अथवा शिवसैनिक यांच्या विरोधात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हेच शिवसेना संपविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत आहे. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले याचे मला काही वाईट वाटले नाही. नगर जिल्ह्यात शिवसैनिकावर संकट आल्यास मी त्यांच्या सोबत राहील. नगर जिल्ह्याचे राजकारण पक्ष विरहित व वैचारिक आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT