Sharad Pawar Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha NCP News : भालकेंची सोडचिठ्ठी, 'बीआरएस'ची एन्ट्री, पक्षातील बंड; मंगळवेढ्यात राष्ट्रवादीची स्थिती काय?

हुकूम मुलाणी

Solapur News : मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा या ठिकाणी झालेला पराभव, भालकेंनी राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी, त्यानंतर पक्षात झालेल्या दोन गटानंतरही तालुक्यात दोन्हीही राष्ट्रवादी उभारी घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत 2024 ला प्रबळ उमेदवारांशी राष्ट्रवादी कसा मुकाबला करणार? यावर मतदारसंघात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi News)

2009 पूर्वी पवार बोले, मंगळवेढा हाले अशी परिस्थिती होती. मात्र मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकारणाने गती घेतल्याने पक्षीय राजकारण मागे पडले. पक्षनेतृत्वाने देखील याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. शिवाय मतदारसंघात असलेल्या प्रमुख प्रश्नांनादेखील न्याय देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. आठ गटात विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 ला दिवंगत भारत भालकेच्या रुपाने 10 वर्षानंतर आमदार मिळाला. पण त्यांच्या अकाली निधनानंतर ती जागा राष्ट्रवादीला टिकवता आली नाही.

मंगळवेढयाचे पालकत्व घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर स्मारक, संत चोखोबा स्मारक, या प्रमुख प्रश्नांकडे सत्ता असताना दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीची विधानसभेची जागा गेली असली तरी मतदार गेला नव्हता, याची जाणीव ठेवून मतदार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्नाला मंजुरी देणे आवश्यक होते.

दरम्यान मे महिन्यात 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजित पाटील राष्ट्रवादी प्रवेशानंतर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. या भावनेतून भगीरथ भालकेनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोठ्या शक्तिप्रदर्शनाने बी.आर.एस प्रवेश केला. भालकेंच्या जाण्याने राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरुन काढण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रखडलेल्या प्रश्नाला हात घालणे आवश्यक होते. शिवाय रखडलेल्या प्रश्नासाठी स्थानिक नेतृत्वाने प्रसंगी आंदोलनाची तयारी देखील ठेवायला हवी होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णय घेतला.

लतीफ तांबोळी,रामेश्वर मासाळ,सोमनाथ माळी यांनी अजितदादाचे समर्थन केले तर राहूल शहा, चंद्रशेखर कौडूभैरी, विजय खवतोडे, संदीप बुरकुल शरद पवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला, अजितदादाच्या समर्थकांनी देखील अजून रखडलेल्या प्रश्नासाठी ताकद लावल्याचे दिसत नाही, राष्ट्रवादीत झालेल्या दोन गटानंतर पुन्हा उभारणीसाठी संघर्ष करावा लागणार आहे तर अभिजित पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढ्यात राजकीय विस्तार वाढविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये गावोगावी डिझीटल फलक लावून राष्ट्रवादीचा संभाव्य चेहराही ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रमुख प्रश्नांकडे राष्ट्रवादीने फिरवलेली पाठ यामुळे राष्ट्रवादी विषयी मतदारामध्ये उत्साह सध्या तरी राहिला नाही, शिवाय अजितदादांच्या पाठीब्यामुळे भविष्यात मंगळवेढ्यात अजितदादा गटाने भाजप आमदाराला पाठींबा दिल्यास आणखी अडचणी निर्माण होणार आहे. तालुकाध्यक्ष पी. बी. पाटील यांच्या अपघाती निधनानंतर दोन महिने होवूनही अदयापही नवीन अध्यक्षाची निवड केली नसल्याने ग्रामीण भागातून भागातून आपली पकड कशी मजबूत करणार असा प्रश्न देखील यानिमित्ताने विचारला जात आहे.

पक्ष नेतृत्वाला तालुक्यात पुर्नपक्षबांधणी कसोटी -

मंगळवेढ्यातील एका विवाहाला हजेरी लावल्याने नेत्याचे कार्यकर्त्याकडे कसे लक्ष असते, हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला असला तरी, पक्षाच्या तालुकाध्यक्षाच्या अपघाती निधनानंतर पक्ष नेतृत्वाने त्या कुटूंबाचे सात्वन देखील केले नसल्याची चर्चा देखील या निमित्ताने ऐकावयास मिळत आहे. पक्षात झालेले गट, मतदारसंघातील प्रमुख प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, भगीरथ भालकेची राष्ट्रवादीला सोडचिठठी यामुळे पुन्हा राष्ट्रवादीची उभारणीची करण्याची मोठी कसोटी आहे. त्यातच पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT