Bidri Sugar Factory Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bidri Sugar Factory: केपींच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आबिटकर सेना सज्ज; रणशिंग फुंकले

Rahul Gadkar

Kolhapur News: राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे बिद्री साखर कारखाना निवडणुकीचा राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या बिजरीतील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकरांची सेना सज्ज झाली असून, नुकताच खासदार संजय मंडलिक, समरजीत घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील यांनी मेळावा घेत के. पी. पाटील यांच्या कारभारावर हल्ला चढविला आहे.

बिद्री कारखान्यात सभासदांच्या हिताच्या कारभाराऐवजी स्वहिताचा कारभार सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांची एकाधिकारशाही ही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे. लै भारीची टिमकी वाजवणाऱ्या के. पी. पाटील यांचा कारभार हा सभासदांच्या हिताचा नव्हे, तर स्वहिताचा आहे," असा हल्लाबोल खासदार संजय मंडलिक यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, "बिद्री कारखाना हा सभासदांच्या हातात सोपविण्यासाठी आमची लढाई आहे. कै. सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांच्या विचारधारेने खासदार संजय मंडलिक व मी एकत्र आलो आहोत.

बिद्री कार्यक्षेत्रातील सभासदांचा बिद्री कारखान्यासाठी ऊस नेला जात नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाविषयी शंका येते. बिद्री कारखाना बिद्रीच्या सभासदांसाठी आहे, की शेजारील खासगी कारखान्याला ऊसपुरवठा व्हावा म्हणून त्यांचा कारभार सुरू आहे ? बिद्री कारखानाच्या निवडणुकीत यावर्षी परिवर्तन अटळ आहे," असे घाटगे यांनी सांगितले.

लोकांच्या अर्थकारणाला गती व बिद्रीच्या हिताचा कारभार हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून परिवर्तन आघाडीची रचना केली आहे. बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मी मुलगा आहे. माझे वडील बिद्री कारखान्याचे कामगार होते. सत्ताधारी मंडळी सभासदांची दिशाभूल करत आहेत. कारखान्याला साठ वर्षे झाली.

मात्र, कारखान्याचा विस्तार आणि विकास त्या गतीने झाला का ? सभासदांचा ऊस वेळेवर नेला जात नाही. मुदाळमधील पन्नास टक्के सभासदांचा ऊस उचलला जात नाही. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचा फायदा सभासदांना होत नसेल, तर तुमच्या सत्तेचा काय उपयोग ? तुम्ही लय भारी कारभाराची टिमकी वाजवता तर संचालक बाहेर का पडले ? असा खडा सवाल आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला.

गेली ३५ वर्षे आपण के. पी. पाटील यांच्यासोबत होतो. मात्र, त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही. सगळे आपल्यालाच ही त्यांची भूमिका सहकारासाठी मारक आहे. म्हणून आपण सभासद हिताची भूमिका घेऊन परिवर्तन आघाडी केली असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT