Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Sena Leader's Prediction : ‘भाजपला विदर्भात केवळ 13-14 जागा मिळतील; फडणवीसांनाही निवडणूक सोपी नाही’

विश्वभूषण लिमये

Solapur, 13 September : भारतीय जनता पक्षाला विदर्भात ओढून ताणून 13 ते 14 जागा मिळतील आणि सर्वात जास्त फटका नागपूरमध्ये बसणार आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच त्यांच्या मतदारसंघात दम लागलाय. देवेंद्र फडणवीसांना विधानसभेची निवडणूक सोपी नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त सोलापूरमध्ये आले होते. गुरुवारी रात्री सभा झाल्यानंतर संजय राऊत यांनी आज सकाळी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भाजपच्या सर्वेपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सर्व मुद्यांवर भाष्य केले.

ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने (BJP) विदर्भात केलेला सर्वे चुकीचा आहे, त्यांनी आकडा फुगवून सांगितला आहे. भाजपला विदर्भात 13 ते 14 जागाच मिळतील, असे सध्याचे वातावरण आहे. संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) ‘केक वॉक’ आहे. पण, आम्ही विदर्भात मेहनत करू. आम्हाला मेहनत करावी लागेल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मोठे यश मिळेल.

नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम झाले. त्यात सोलापूरची तयारी पक्की आहे, हे दिसून आले. दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसनेने अनेकदा जिंकलेली जागा आहे. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा हा विषय येईल, तेव्हा दक्षिण सोलापूर मतदारसंघावर नक्कीच चर्चा होईल. आमच्या संभाव्य उमेदवाराला कामाला लागा, हे सांगायला हरकत नसते. इथे शिवसनेचा आमदार असावा, ही आमची इच्छा आहे, असेही राऊतांनी पुन्हा सांगितले.

संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी 170 ते 175 जागा नक्की जिंकू. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेसुद्धा खासगीत मविआचा हाच आकडा सांगतील. महायुतीवाले सध्या वरवरच्या बाता मारत आहेत. पण, महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे.

मुंबईतसुद्धा आमच्या बाजूने वातावरण आहे. घाटकोपर ही शिवसेनेची जागा आहे. बोरिवली आम्ही लढलाे आहे. लोकसभेला जे चित्र होते, तेच किंबहुना त्यापेक्षा चांगले वातावरण विधानसभेसाठी महाविकास आघाडीला आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

अडाणी पुनर्वसनाला विरोध

धारावीतील जनतेचा अडाणी पुनर्वसनला विरोध आहे. जिथे जमीन मोकळी दिसते, तिथे अडाणीचा बोर्ड लागतो. संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचा डाव आहे. मुंबईचा मिठागर आणि संपूर्ण मुंबई अडाणीला देण्याचा डाव आहे, असा आरोपही शिवसेना खासदाराने केला.

मनसेला सुबुद्धी सुचली असेल

राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करू, असं वक्तव्य माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेले नाही. त्यांचे वक्तव्य तोडून फोडून समोर आणलं आहे, असे सांगून मनसेने आयोजित केलेल्या अजमेर यात्रेवरही भाष्य करताना मनसेसारख्या पक्षाला कोणतीही भूमिका असण्याचं कारण नाही. पण त्यांनी जर अजमेर यात्रेचे आयोजन केले असेल तर वाईट वाटायचं कारण नाही. मनसेला सुबुद्धी सुचली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, अशी भूमिका मांडली.

चंद्रचूड असेपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही

धनंजय चंद्रचूड जोपर्यंत, सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर आहेत, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. या देशातील घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे, आरोपही संजय राऊतांनी केला.

महाविकास आघाडीतील लोक लाडक्या बहिण योजनेला बांबू लावत आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना त्यांच्याच महायुतीमधील लोक लाडक्या बहीण योजनेला बांबू लावत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षाने वेगळा जाहीरनामा जाहीर केला, त्यात गैर काहीच नाही. प्रत्येक पक्षाला वेगळा जाहीरनामा जाहीर करण्याचा हक्क आहे, असेही ते म्हणाले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT