Aditya Thackeray
Aditya Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजकारणातील भाजपचे होणारे प्रदुषण दूर ठेवलेय

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) - सोनईतील ( ता. नेवासे ) मुळा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल व डिस्टीलरी प्रकल्पाचे उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी भाजपकडून होत असलेल्या आरोपांचा जोरदार प्रतिउत्तर दिले. ( BJP's pollution in politics has been kept away )

सोनई येथील मुळा साखर कारखान्याच्या 80 कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल प्रकल्प उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. खासदार सदाशिव लोंखडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, अहमदनगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, युवा नेते उदयन गडाख, अहमदनगर शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. 'मुळा'अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, भाऊसाहेब मोटे व संचालकांनी मान्यवरांचा सत्कार केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा विकास घडवित असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणातील प्रदुषण आपण दूर ठेवले आहे. त्यांचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी घाणेरडे आरोप करतात. महाराष्ट्रात जणू घाणेरडे राजकारण करण्याची जबाबदारीच त्यांनी घेतली आहे. त्यासाठीच ते आरोप करतात. आता यापुढे विकास कामांना अग्रक्रम देताना महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी दंड थोपटून तयार आहेत.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कधी सत्तेचा माज केला नाही. जनतेची 24 तास सेवा करू अशी शिवरायांची शपथ घेऊन आम्ही काम करत आहोत. शेतकरी, महिला, तरुण अशा समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करण्याबाबत मुख्यमंत्री कुठे मागे राहिलेले नाहीत. कोरोना संकटकाळात महाराष्ट्राने आकडे लपविले नाहीत. तर बेड वाढविले. ऑक्सिजनचे नियोजन केले. उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये सत्ताकारणासाठी लढाया सुरू आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना लखीमपूर सारखी घटना घडली. शेतकऱ्यांवर लाठ्या व गोळ्या चालविल्या. निवडणुका तोंडावर येताच लखीमपूर घटनेतील आरोपी सोडून देण्यात आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हिंदू ह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिली आहे की, सत्तेचा माज मनात आणू नका. लोकांची कामे 24 तास करत रहा. सरकारे येतात जातात मात्र नाव गेले तर पुन्हा येत नाही. म्हणून नाव जपणे गरजेचे आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करायचं. सत्तेत बसल्यावर मात्र 100 टक्के समाजकारण करायचं हेच विचार घेऊन चालायचे आहे, असा संदेश आदित्य ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या भाषणात पुर्वीच्या भाजप आमदाराच्या सांगण्यावरून मुळा कारखाना, मुळा एज्युकेशन या शेतकऱ्यांच्या निगडीत संस्थेवर नांगर फिरविण्याचा उद्योग केला. शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करुन भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तसे विधेयक मंजूर केले. या संकटात उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर साथ दिल्याने शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक हजार शिवसेना शाखा व एक लाख नवीन शिवसैनिकांचा मेळावा घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व खासदार सदाशिव लोंखडे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी केले.

उद्धव ठाकरेंनी आम्हाला न्याय दिला

चाळीस वर्षे ज्या पक्षासाठी प्रामाणिक काम केले. अनेक राजकीय वार झेलले. त्यांनी कधीच आमची कदर केली नाही. ताकद देवूनही नेहमी भ्रमनिरास केले. संकटात साथ दिली म्हणून मंत्री गडाखांना शिवसेनेत जाण्याची परवानगी दिली, असे सांगून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले.

जल्लोषात स्वागत

'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषात पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे सोनईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी,पुष्पवृष्टी,जयजयकाराच्या घोषणांसह युवकांनी पस्तीस फुट लांबीचा पुष्पहार घालून नागरी सत्कार केला. हा अपुर्व सोहळा पाहण्यासाठी हजारो युवक, युवती व ग्रामस्थ उपस्थित होते. मुळा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे शिर्डी येथील दर्शन आटोपून मोटारीने सोनई परिसरात येताच त्यांचे वंजारवाडी, यशवंतनगर, बेल्हेकरवाडी फाटा, शहाजी चौकात उभ्या असलेल्या युवकांनी शिवसेनेचा जयघोष करत स्वागत केले.

युवानेते उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गाव व परिसरातील सर्वधर्मिय युवक व ग्रामस्थांनी मुळा पब्लिक स्कुल ते आंबेडकर चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे व पताका लावून संपुर्ण मार्ग भगवामय केला होता.संपुर्ण रस्ता पाण्याने स्वच्छ करुन ठिकठिकाणी स्वागत कमानी टाकण्यात आल्या होत्या. अमृत महोत्सव वेशीजवळ मुख्य स्वागताचे कार्यक्रम संपन्न झाला. येथे उदयन गडाख यांनी ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मुस्लीम बांधवांचा जल्लोष

सोनई येथील नजीर शेख, इरफान शेख, फारुक पठाण, सलीम बागवान, मन्सूर शेख सह मुस्लीम बांधवांनी गळ्यात भगवे उपरणे घालुन ठाकरे यांचे स्वागत केले. शिवसेनेच्या जयजयकारच्या घोषणा त्यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT