Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde, Rahul Narwekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena Disqualification News : सत्तासंघर्षावर बावनकुळेंना विश्वास! म्हणाले, 'बी प्लॅन'ची काही गरज नाही

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतील शिवसेनेतील १६ आमदार अपात्र निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास व्यक्त करून सूचक वक्तव्य केल्याने विरोधकांची धाकधूक वाढली आहे. (Latest Political News)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) २०१९ ला राजकीय आडाखे तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. परिणामी सर्वात अधिक १०५ जागा जिंकूनही भाजप नेते विरोधात बसले. यानंतर मात्र भाजपने दीड वर्षात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला दणके देत या पक्षातील मोठे नेते गटासह आपल्या बाजूने वळवले.

यानंतर राज्यात महायुती सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. हा निकाल विरोधात गेल्यास भाजपचा 'बी प्लॅन' काय आहे, यावर राज्यात चर्चा आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांनी छेडले. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, 'काही गरज नाही बी प्लॅनची. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निषणांत वकील आहेत,' असे सूचक वक्तव्य केले. तसेच 'ते योग्य निर्णय घेतील,' असे सांगण्यासही बावनकुळे सांगण्यास विसरले नाहीत.

अजित पवार नाराज आहेत का, ते अमित शाह यांच्या दौऱ्याला उपस्थित नव्हते, आमदार अपात्रतेचा निकाल विरोधात गेला तर सरकारला धोका आहे का? असे अनेक प्रश्न बावनकुळे यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले. यावर त्यांनी 'शिंदे-फडणवीस-पवार यांची महायुती अभेद्य आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम, नागपूरमधील पूर अशा कारणांनी अनेक नेते व्यस्त होते. मात्र, सरकारकडे आज मितीला २२३ आमदारांचे पाठबळ आहे. आजच्या दिवशी दहा आमदारांची प्रवेशाची यादी आमच्याकडे आहे,' असा खुलासा बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

सध्या सरकारची ताकद मोठी आहे. सरकारला तब्बल २२३ चे पाठबळ आहे. त्यामुळे २०२४ विधानसभा निकलानंतर हे संख्याबळ आणखी वाढलेले असेल, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला, तर विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता निवडण्याइतके बहुमत नसणार आहे, असा टोलाही बावनकुळेंनी ठाकरे-पवार-पटोले यांना लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT