Congress-NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : महाआघाडीत वाद पेटणार; सोलापुरात राष्ट्रवादीच्या चार मतदारसंघांवर काँग्रेसने सांगितला हक्क

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 September : सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी सात मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. यात मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार मतदारसंघाचा समावेश असून हे चार मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत पक्षश्रेष्ठींपुढे केली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप हा महाविकास आघाडीपुढील सर्वांत मोठा पेच असणार आहे.

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक (Congress Western Maharashtra Meeting ) पुण्यात पार पडली.

त्यात बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहाही जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींपुढे केली आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी तर या सहा मतदारसंघासोबतच माढा मतदारसंघही काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या आहेत, त्यामुळे या मतदारसंघात येणारे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर आणि मोहोळ हे मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी भूमिका शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडली, तर जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघासह माढा विधानसभा मतदारसंघही काँग्रेस पक्षाकडे घ्यावा, अशी मागणी केली.

काँग्रेसने दावा केलेले सातपैकी चार मतदारसंघ हे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी हे चार मतदारसंघ काँग्रेसला देणार का, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप महाविकास आघाडीत सर्वांत मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत असलेल्या कम्युनिस्ट पक्षासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडावा, अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी अनेकदा केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवले आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत सर्वांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या बैठकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा आडम मास्तरांना सोडू नये, असे भावना शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT