काँग्रेसमधील गटबाजी आणि बंडखोरीला कंटाळून पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये दाखल झाले.
यानंतर सहा वरिष्ठ नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी दावेदारी केली आहे.
आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमोर नव्या निवडीचे मोठे आव्हान उभे आहे.
Sangli News : काँग्रेसला भाजपने मोठं खिंडार पाडले असून दोन मोठे नेते फोडले आहेत. यामुळे आर्धीहून अधिक काँग्रेस संपल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दोन महिन्यात आधी जयश्री पाटील आणि आता जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीला कंटाळून भाजपची वाट धरल्याचेही बोलले जाते. यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. तब्बल सहा जणांनी शड्डू ठोकला असून काँग्रेस नेतृत्वापुढे नवे आव्हान उभे झाले आहे. तर आगामी स्थानिकच्या आधीच काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. तर नवा जिल्हाध्यक्ष कोण होणार कोणाच्या गळ्यात माळ पडणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये देखील लागली आहे.
काँग्रेसचे अकरा वर्षे शहर जिल्हाध्यक्ष राहिलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. तर आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता घेण्याकडे वाटचाल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता काँग्रेससमोर नवे आव्हान निर्माण झाले असून रिक्त जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसमध्ये या पदासाठीच्या शर्यतीत सहा मातब्बरांनी शड्डू ठोकला असून दावाही केला आहे. त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमोर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पेच निर्माण झाला आहे. नव्या चेहऱ्याला संधी, ज्येष्ठाला प्राधान्य की धार्मिक समीकरणातील बेरजेचे राजकारण कसे करावे हा प्रश्न आता त्यांच्या समोर उभा आहे. तर विश्वजित-विशाल हे कशाला प्राधान्य देणार हे देखील पाहावं लागणार आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्याकडे 2014 मध्ये सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. याकाळात राज्यासह देशातही सत्ता नसताना त्यांनी नेटाने रस्त्यावरची लढाई लढली. दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेसमधील गटबाजी आणि बंडखोरीमुळे दोन्ही वेळी त्यांची हार झाली. 2024 मध्येतर जयश्रीताईंनी बंडखोरी केली नसती तर ते नक्कीच आमदार झाले असते. या वेदनेमुळेच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.
दरम्यान गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांमुळे एकीकडे काँग्रेसमध्ये चिंतेचे वारे वाहत होते. तर दुसरीकडे रिक्त होणाऱ्या पदावर वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी, माजी नगरसेवक राजेश नाईक, मंगेश चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, मयूर पाटील, संजय मेंढे या प्रमुख नावांची आता चर्चा सुरू झाली आहे. तर या सर्वांच्या समर्थकांनी समाज माध्यमांतून या पदावर दावा सुरू केला आहे.
अय्याज नायकवडी हे सर्वाधिक काळ काँग्रेससोबत असून त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झोकून काम केले होते. विधान निवडणुकीत त्यांनी बंडखोरीला उघड विरोध करत काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तर जयश्री पाटलांच्या विरोधात प्रचार केला होता. मंगेश चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, मयूर पाटील हे विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक असून सांगलीतील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये यांची वर्णी लागते. राजेश नाईक हेही ज्येष्ठ काँग्रेसचे नेते असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत काँग्रेसलाच आव्हान दिले होते. तर जिंकलेही होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. ते आजही पक्षातच आहेत. सांगलीत दावेदार पाहता मिरजेला संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो. अशावेळी माजी नगरसेवक संजय मेंढे यांनीही दावा केला आहे. त्यांना पदावरून काढण्याच्या मुद्यांवर गेल्या दोन महिन्यांत पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांच्यात सुप्त संघर्षही झाला होता.
महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्याची समीकरणे अर्थातच विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वात ठरतील. मात्र, ही समीकरणे जुळवताना कौशल्याचा कस शहर जिल्हाध्यक्षाचाही लागणार आहे. त्यामुळे मुरब्बी नेत्याला संधी द्यायची की राज्यात आणि केंद्रात विरोधक म्हणून आवाज उठवण्यासाठी तगडा युवा उमेदवार निवडायचा, याचा कस लागणार आहे.
प्रश्न 1: काँग्रेसमधून कोण भाजपमध्ये गेले?
👉 पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेशले.
प्रश्न 2: काँग्रेसमध्ये किती दावेदार पुढे आले आहेत?
👉 तब्बल सहा वरिष्ठ नेत्यांनी दावेदारी केली आहे.
प्रश्न 3: काँग्रेस नेतृत्वासमोर कोणते आव्हान आहे?
👉 गटबाजी, बंडखोरी आणि सहा दावेदारांमुळे एकजूट राखण्याचे मोठे आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.