
गेल्या दोन महिन्यांत सांगलीत काँग्रेसला जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मोठा धक्का बसला.
हे दोघे आता भाजपमध्ये असले तरी त्यांच्यातील कट्टर वैर अद्याप कायम आहे.
भाजप प्रवेशानंतरच्या पहिल्याच भाषणात पृथ्वीराज पाटील यांनी अप्रत्यक्ष टीका करत वैराची झलक दाखवली.
Sangli News : गेल्या दोन महिन्यात काँग्रेसला सांगलीत दोन मोठे धक्के बसले. पहिला होता जयश्री पाटील यांच्या रुपाने आणि दुसरा धक्का बसला तो पृथ्वीराज पाटील यांच्या रुपाने. दोघांनीही अलिकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे दोघेही जाताना एकटे गेलेले नाहीत. तर बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांना आणि मोठ्या चेहऱ्यांना सोबत घेऊनच त्यांनी भाजप गाठली आहे.
दुसऱ्या बाजूला जे दोघे भाजपवासी झाले ते दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक. त्यामुळे या दोघांचे एकाच पक्षात एकमेकांशी पटणार का? अन् पटलेच तर कसे? आणि मुळात कोणत्या मुद्द्यावर जमणार? असे प्रश्न सध्या विचारले जातात. या दोघांमधील संघर्षाची पहिलीच झलक पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर केलेल्या भाषणात बघायला मिळाली.
पृथ्वीराज पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांचे सहकार्य असेल तरच सांगलीसाठी भाजपमध्ये राहून काम करता येईल. अन्यथा आपण अद्याप काँग्रेसमध्येच असल्याची जाणीव होत राहील अशी कबुली दिली. एका अर्थाने त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्यांना बाजूला सारले जावू नये, अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा हेतू स्पष्ट केला. त्यावेळी त्यांनी व्यासपीठावर असणाऱ्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसमध्ये ज्यांनी मदत केली, त्या सर्वांची नावे घेतली. मात्र पाटलांनी आपल्या 15 मिनिटांच्या मनोगतात शेवटपर्यंत जयश्रीताईंचे नाव काही घेतले नाही. विशेष म्हणजे त्यांनी समित कदम यांचे नाव घेतले. पण जयश्रीताईंचे नाव टाळले.
जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमुळे या शत्रुत्वाला आणखी धार आली. या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे नाराज होऊन जयश्रीताईंनी बंड केले. अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि इथेच पृथ्वीराज पाटील यांचा घात झाला.
पृथ्वीराज पाटील यांना सुमारे 75 हजार मते पडली. तर जयश्रीताईंना 35 हजारांवर समाधान मानावे लागले. भाजपचे सुधीर गाडगीळ 1 लाख 15 हजार मते घेऊन विजयी झाले. पण यावेळी बंडखोरी झाली नसती, तर नक्कीच पृथ्वीराज पाटील आमदार झाले असते, अशी कबुली दस्तुरखुद्द चंद्रकांत पाटील आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील दिली.
कदाचित हा पराभवच पृथ्वीराज पाटील यांच्या जिव्हारी लागला. ज्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी फिल्डींगही लावली होती. पण त्यांच्याआधीच जयश्रीताईंनी भाजपचा रस्ता धरला होता. आता भाजपमध्ये राहून भांडता येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा सुप्त संघर्ष कसा आकार घेतो, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
प्र. 1: जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचा पक्ष बदल कधी झाला?
उ. 1: गेल्या दोन महिन्यांत दोघांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
प्र. 2: ते दोघे आधीपासून विरोधक होते का?
उ. 2: होय, ते दोघे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.
प्र. 3: भाजप प्रवेशानंतर संघर्षाची झलक कधी दिसली?
उ. 3: पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरच्या पहिल्याच भाषणात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.