Prithviraj Chavan, Satej Patil, Vishwajit Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress News : कोल्हापूर-पुणे टोलविरोधात सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण अन् विश्वजीत कदम आक्रमक, घेतला 'हा' मोठा निर्णय

Rahul Gadkar

Kolhapur News, 31 July : कोल्हापूर-पुणे प्रवास करताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास होत असताना आणि रस्त्याचे काम सुरु असताना टोल घेणे चुकीचे आहे. वाहनधारकांकडून टोल घेतला जाऊ नये, अशा विविध मागण्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे.

तर येत्या शनिवारी (3 ऑगस्ट) टोलच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या घोषणेमुळे आता पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

सातारा ते कोल्हापूर या महामार्गावर (Satara-Kolhapur Highway) अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. पावसामुळे आधीच काम सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा खूप वेळ वाया जात आहे.

प्रवाशांची होणारी गैरसोय आणि तरीही वसूल केला जाणार टोल या मुद्द्यांवर आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (Prithviraj Chavan) आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी आज 'व्हिसी'द्वारे मिटिंग घेतली.

टोल न देताच वाहने मोफत सोडावी

या मिटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर आता कोल्हापूर (Kolhapur) ते सातारा प्रवास करण्यासाठी सुमारे चार तास लागतात. प्रवाशांना त्रास होतो. काम सुरु असताना टोल घेणे चुकीचे असून तो घेतला जाऊ नये यासाठी शनिवारी मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच तर टोल न देताच वाहने मोफत सोडावी, रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा आणि रस्ता होईपर्यंत टोल आकारणी नको, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

तसंच कामं सुरु असताना टोल घेतला जावा का? याबाबत कायदा तपासाला पाहिजे. रस्त्याच्या कामामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे किमान कामं होईपर्यंत टोल आकारला जावू नये. आंदोलनात सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील, आंदोलनास आमचा पाठिंबा असेल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

रस्त्याच्या कामात दिरंगाई सुरु असतानाही टोल आकारणी सुरु आहे. याबाबत जन आंदोलन उभारलं पाहिजे. त्यासाठी सांगली काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं.

कुठे केलं जाणार हे आंदोलन?

तर टोल विरोधातील आंदोलन हे कोल्हापूर-किणी टोल नाका, कराड-तासवडे टोल नाका आणि सातारा-आनेवाडी टोल नाका या ठिकाणी करण्यात येणार आहे. यावेळी कोणतेही वाहने अडवण्याचे नाही, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन आंदोनकर्त्यांना काँग्रेस नेत्यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT