Congress News: लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मात्र दाणादाण उडाली. लाजिरवाणी बाब म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ गाठणंही काँग्रेसला जमलं नाही. यानंतर अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षांची वाट धरली. हे धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाबाबत पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मातब्बर नेत्यानं मोठं विधान केलं आहे.
सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेस भवनात पार पडलेल्या बैठकीत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, आज भाजप जरी सत्तेवर असले तरी आज ना उद्या सत्ता पलटेल आणि काँग्रेस सत्तेवर येईल असा आशावाद जागवला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
कदम म्हणाले, काँग्रेस पक्ष काहीजण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेस सोबतच आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लोकांनी भरपूर मदत केली. यामुळे आजही तळातील सामान्य माणूस काँग्रेस विचाराला आपले मानणारा आहे, हे स्पष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी आगामी महापालिका निवडणुका काँग्रेस ताकदीने लढविणार असल्याचा दावाही केला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
विश्वजित कदम यांनी यावेळी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचाच आधार वाटत असल्याची भावनाही बोलून दाखवली. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष सामान्यांच्या ताकदीवर लढणार असून त्यासाठी लागेल ती सगळी मदत आपण स्वत: आणि खासदार विशाल पाटील करू, असा शब्दही काँग्रेसच्या बैठकीत दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर ढेपाळलेल्या महाविकास आघाडीबाबतही विश्वजित कदम यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जयंत पाटील व रोहित पाटील यांच्याशी निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करणार आहोत.
तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतही चर्चा करून स्थानिकच्या निवडणुका एकजुटीनं लढण्याचाच आमचा प्रयत्न असल्याचा निर्धारही कदम यांनी बोलून दाखवला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पदरात मोठं अपयश आल्यानंतर आता विश्वजित कदम यांनी आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावाही केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.