
Mumbai News: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन 20 वर्षांपासूनचे राजकीय तसेच कौटुंबिक वैर मिटवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अन् शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी मोठे पाऊल उचलले. विजयी मेळाव्यात स्टेजवर मनोमिलन झालेल्या उद्धव ठाकरेंनी नंतर गणेशोत्सवात सहकुटुंब थेट 'शिवतीर्था'वर जात वैर मिटल्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं. यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मोठे विधान केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च मान देण्याची तयारीत असल्याचं वक्तव्य करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) दिसणार असल्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
अहिर म्हणाले, यंदाच्या दसरा मेळाव्यात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं आहे. यंदाचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा 'न भूतो न भविष्यती', स्वरुपाचा असणार असल्याचं विधानही सचिन अहिर यांनी केलं आहे.
याचदरम्यान,त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नसल्याचंही अहिर म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं, ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते महाराष्ट्रासाठी गरजेचं असल्याचंही सचिन अहिर म्हणाले. याचवेळी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं सांगत ही राज्यातील लोकांच्या मनातील भावना असल्याचं मतही अहिर यांनी व्यक्त केलं आहे.
यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मराठी माणसासाठी अस्तित्त्वाची लढाई असणार आहे. मी 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत होतो. पण तेव्हा आम्हाला कधीही शिवसेनेसारखा पक्ष नसावा, असं वाटलं नसल्याचं सांगत आम्ही राज्यात नेतृत्व करतानाच महानगरपालिका शिवसेनाच चांगली चालवू शकते, अशी आमची भावना असल्याचंही अहिर यांनी म्हटलं.
मुंबईचे स्वरुप आता बदलत चालले आहे. त्यामुळे मुंबईत आता मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन नेतृत्त्व करणे, ही काळाजी गरज आहे, असल्याची भूमिकाही सचिन अहिर यांनी मांडली आहे.
गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरु होत असून यंदाच्या दसऱ्याला तुम्हांला नक्कीच चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षाही सचिन अहिर यांनी बोलून दाखवली आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करणार असल्याचंही अहिर यांनी सांगितलं.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या नात्यात जवळीक वाढताना दिसत असून उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच शिवतीर्थावरही गेले होते. राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठाकरे बंधू ठरत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्तानेही ते पुन्हा एकदा एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी ठाकरे बंधुंमध्ये गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.