Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election : विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचे षडयंत्र; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

विश्वभूषण लिमये

Solapur, 15 August : राज्यातील सर्वच राजकीय पक्ष सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात्रा, मेळावा, बैठका आदींच्या माध्यमातून तयारीला वेग आला आहे. मात्र, या सर्व धामधुमीत काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ‘आगामी काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मात्र, त्या निवडणुकाही पुढे ढकलण्याचे षडयंत्र सुरु आहे,’ असा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) ह्या सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खासदार शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.

त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण देशात साम, दाम, दंड, भेद, ईडी, भीती, पैसा वापरूनसुद्धा लोकशाहीचा विजय झाला. धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विचारसरणी हा भारत देशाचा पिंड आहे, भाजपने कितीही प्रयत्न केला तरी तो संपवू शकत नाहीत.

काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मात्र त्या निवडणुकाही पुढे ढकलण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यांना संविधानाने दिलेली कोणतीही गोष्ट मान्य नाही. संविधानाच्या बाहेर जाऊन सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न ते प्रयत्न करत आहेत. सोलापुरात मागच्या 3 वर्षांपासून महापालिका निवडणुका घेतल्या नाहीत, पाणीपट्टी 10 पटीने वाढवली आहे.

त्यामुळे भाजप घेत असलेल्या सर्व अन्यायकरक निर्णयाचा आम्ही निषेध करतो. पण शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्याचे आम्ही वचन देतो, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

मागील दोन ते अडीच वर्षांपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांच्या निवडणूक प्रलंबित आहेत. विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी करूनही सरकारकडून निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. ही पार्श्वभूमी खासदार प्रणिती शिंदे यांच्या या विधानाला असू शकते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या, आज या मातृभूमीचा वाढदिवस आहे, त्या निमित्त सर्वांना शुभेच्छा. आज 10 वर्षांनंतर सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे, याचा आनंद वाटत आहे. बॉर्डरवर जाऊन लढावं, हे सर्वांच्या नशिबात नसतं मात्र, आपल्या संविधानाने लोकसभेत जाऊन लोकांसाठी लढण्याची संधी दिली आहे.

सत्ताधारी हे आपल्या संविधानाला धोका पोहोचवत आहेत. संविधान बदलण्याचे कटकारस्थान करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आरक्षण हे खासगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचं षडयंत्र रचत आहेत, असा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकावर केला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT