Devendra Fadnavis Meeting with Vantara Officials  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadevi Controversy : मोठी बातमी : माधुरी परत येणार? 'वनतारा'ही जनतेसोबत, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

Madhuri Hatti Return : माधुरी हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टातही राज्य सरकार दाद मागणार आहे.

Rahul Gadkar

बातमीत थोडक्यात काय?

  1. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणाला परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

  2. मुख्यमंत्री आणि वनतारा व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर सकारात्मक चर्चा झाली असून, वनतारा प्रशासनाने सद्यस्थितीवरून ते पक्षकार होण्याचे आश्वासन दिले आहे.

  3. हजारो लोकांनी निवेदने, मोर्चे, आणि अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे; वनतारा आणि सरकारची संयुक्त याचिका मान्य झाल्यास माधुरीला परत आणणे शक्य आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तिणीला परत आणण्यासाठी मंगळवारी राज्य सरकारकडून मुंबईत जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकार माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वनतारा प्राणी संग्रहालयाचे सीईओ विहान करणी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी महादेवीला परत आणण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने याचिका केल्यानंतर त्याबाजूने वनतारा प्रशासन असेल, असेही आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी मुंबई झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत माधुरीला परत आणण्यासाठी राज्य सरकारही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेत पक्षकार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आता वनतारानेही त्यास पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने माधुरी हत्तीणीला परत आणण्याची शक्यता वाढली आहे.

वारंवार उपस्थित होणारे प्रश्न :

  1. प्रश्न: महादेवी (माधुरी) कोण आहे आणि का तिला परत आणण्याची मागणी होत आहे?
    उत्तर: ती नांदणी मठातील धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे, ज्याला जनतेने पुन्हा मठात आणण्याची मागणी केली आहे.

  2. प्रश्न: कोणत्या कोर्टाच्या निर्णयामुळे तिला गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्याचा आदेश आला?
    उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेऊन तिला वनतारामध्ये हलवण्यात आले.

  3. प्रश्न: राज्य सरकारने काय धोरणात्मक पाऊल उचलले आहे?
    उत्तर: न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे शासन आणि मठ साथ देतील.

  4. प्रश्न: वनतारा प्रशासनाने काय भूमिका स्वीकारली आहे?
    उत्तर: त्यांनी सरकारला पक्षकार बनून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच पुनर्वसन केंद्रासाठी आवश्यक मदत देणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT