Maratha Community Movement At Mohol Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Maratha Agitation : 'नैतिकता शिल्लक असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'; सोलापुरात मराठा समाज आक्रमक

Vijaykumar Dudhale

Solapur News : जालन्यातील आंदोलकांवर उगारलेल्या काठ्या या पोलिसांच्या असल्या तरी न दिसणाऱ्या काठ्या ह्या सरकारच्या होत्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या लाठीहल्ल्याची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच, त्यांच्यात नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. नाही तर आगामी निवडणुकीत मराठा समाज तुम्हाला जागा दाखवून देईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे ॲड श्रीरंग लाळे यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis should resign as Home Minister)

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच, सोलापूरहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. मोहोळमध्ये बोलताना लाळे यांनी हा इशारा दिला आहे.

लाळे म्हणाले की, जालन्यातील आंदोलकांवर उगारलेल्या काठ्या या जरी पोलिसांच्या असल्या तरी न दिसणाऱ्या काठ्या ह्या सरकारच्या होत्या. त्याच सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारसुद्धा आहेत. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जे चुकीचे कृत केले आहे, त्यासाठी त्यांनी माफी मागावी. निवेदनाद्वारे त्या मागण्या आम्ही तहसीलदारांकडे केल्या आहेत. आमच्या मागण्यांप्रमाणे कार्यवाही झाली नाही, तर सोलापूरची जनता तीव्र आंदोलन करेल. लवकरच निवडणुका आहेत, लोकांना सगळं चांगलं कळतं. न दिसणाऱ्या काठीच्या विरोधात मराठा समाज एकवटून तुम्हाला तुमची जागा दाखवतील.

मराठा समाजाच्या आंदोलकांवर जो अमानुष लाठीहल्ला केला आहे, त्याचा आम्ही तहसीलदारांकडे निवदेन देऊन निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, आमची ती जखम आहे. जालन्यातील लाठीचार्जने त्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अमानुष सरकारने केलेले आहे, असेही लाळे म्हणाले.

मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पण, पोलिसही आमचेच बांधव आहेत. आमच्या विरोधात आमचेच बांधव उभे करणारे अण्णाजी पंतांची औलाद आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे संभाजी ब्रिगेडच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, सरकारने आता जागे व्हावे, मराठा समाजाचा अंत आता बघू नये. शांततेत मोर्चे काढून जगाला आदर्श घालून देणाऱ्या मराठा समाजाचा तुम्ही अपमान करू नका. नाही तर आम्हाला योग्य उत्तर द्यावे लागेल अथवा तलवारी काढाव्या लागतील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली निंबाळकर यांनी दिला.

जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषींना निलंबित करून लाठीहल्ल्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोलापूरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

सत्तेत असूनही भाजपला एकही प्रश्न सोडावायचा नाही. फक्त मतांसाठी त्यांना उपयोग करून घ्यायचा आहे. समाजासमाजात आणि जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. हे सरकार म्हणजे ब्रिटिशाची अवलाद आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT